एकूणच हवामानविषयक अंदाजांना अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत हलक्यात घेतले जायचे. भारतासारख्या कृषीप्रधान देशाचे पावसाचे अंदाज कसे चुकू शकतात? असे साधे प्रश्न समाजाला पडायचे. त्याची कारणेही तशीच होती. भारतीय हवामान विभाग आणि शास्त्रज्ञांना अमेरिका किंवा अन्य प्रगत देशांकडून काही संदेश किंवा संकेत दिले जात होते. त्यावरून भारतीय संशोधक त्या गणितीय मॉडेल आणि हवामान परिस्थितींचा अभ्यास करून पावसाचे अंदाज मांडत असत. त्यामुळे त्यात हमखास विसंगती असायची. पण, मागील काही वर्षांचा अभ्यास किंवा पावसाच्या आगमन आणि विस्ताराचा अभ्यास पाहता भारतीय हवामानशास्त्र (आयएमडी) विभागाचे बहुतांश अंदाज खरे ठरले आहेत. पण, यातही 2015 मध्ये पावसाने सर्वांनाच चकवा दिला होता. त्यामुळे देशात मोठी ओढ निर्माण झाली होती.
“भारतीय मॉडेल’
वर म्हटल्याप्रमाणे परदेशांकडून मिळणारी माहिती, त्यावरून भारतीय उपखंडातील भौगोलिक परिस्थितींच्या नोंदी आणि अभ्यास, महासागरांतील हवामान स्थिती या सर्वांच्या गणितीय मॉडेलमध्ये बऱ्याचदा पावसाचा अंदाज चुकायचा. पण, 2004 नंतर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वत:चे मॉडेल विकसित केले आहे. विशेष म्हणजे, ते पूर्वीपेक्षा सरस आणि बहुतांश अचूक ठरत आहे. त्यामुळे हवामान अंदाजाचे खऱ्या अर्थाने “भारतीय मॉडेल’ विकसित झाले आहे, असे म्हणण्यास संधी आहे.
अत्याधुनिक सांख्यिकीय अभ्यास
केरळमध्ये मान्सूनचे आगमन कधी होणार, याबाबत हवामान विभाग 2005 पासून अंदाज वर्तवत आहे. त्यासाठी आगमनाच्या 4 दिवस कमी/अधिक दिवस गृहित धरले जात आहेत. त्यात अत्याधुनिक सांख्यिकीय मॉडेलचा उपयोग केला जातो. शिवाय, 6 भौगोलिक घटक जे पावसाच्या आगमनावर परिणाम करू शकतात, ते घटकही त्यात जोडण्यात आले आहेत.
या भौगोलिक स्थितीमुळे मिळतात पावसाच्या आगमनाचे पूर्वसंकेत
*वायव्य भारतातील कमीतकमी तापमानाची नोंद
*भारतीय प्रायद्वीप पठारातील दक्षिण भागात (गंगा आणि यमुना नद्यांच्या क्षेत्रातील विशाल भूखंड) पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण
*दक्षिण चीन समुद्रावरील बहिर्गामी दीर्घतरंग विकिरण (ओएलआर) ज्याचा ओलावा आणि आर्द्रतेवर परिणाम होतो.
*आग्नेय हिंदी महासागरात खालील भागात क्षोभमंडल म्हणजेच ट्रोपोस्फिअर- जो पृथ्वीच्या वातावरणाचा सर्वांत पहिला आणि खालील भाग असतो. तेथील हवेचा दाब
*पूर्व भागातील भूमध्यरेखीय हिंद महासागराच्या वरील भागातील क्षोभमंडलावरील हवेचा दाब
*नैऋत्य प्रशांत महासागरातील बहिर्गामी दीर्घतरंग विकिरण
*या सर्व भौगोलिक परिस्थिती, नोंदींचा अभ्यास करून पावसाच्या म्हणजेच मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिले जातात. अर्थात त्याला उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या संकेतांचीही जोड असते.
अंदमानचा “पाऊस’ वेगळा
हवामान विभागाने म्हटले आहे, की “मागील काही वर्षांची पावसाच्या आगमनाची स्थिती पाहिल्यास, अंदमान समुद्रावरून येणाऱ्या पावसाच्या प्रगतीचा संबंध केरळमध्ये मोसमी पाऊस सुरू होण्याच्या तारखेशी जोडता येणार नाही. शिवाय, मोसमी पावसाने देश व्यापण्याच्या स्थितीशीही संबंध जोडता येणार नाही.’