पुणे -कोणतीही भाषा ही दैनंदिन जीवनात तिचा वापर करणाऱ्या भाषकांमुळे समृद्ध आणि प्रवाही होत असते. मराठी भाषकांनी देखील आपल्या भाषेविषयी प्रेम आणि आस्था बाळगणे आवश्यक आहे. राजकीय उदासीनतेमुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यास विलंब होत आहे, असा सूर मराठी भाषेतील साहित्यिकांनी काढला.
“मराठी अभिजातचे घोडे नेमके अडले कोठे?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात लेखक प्रा. हरी नरके आणि लेखक डॉ. रवींद्र शोभणे सहभागी झाले होते.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, “”राजकीय उदासीनता आणि मराठी भाषकांमधील निरुत्साह या दोन प्रमुख कारणांमुळे मराठीला अभिजात दर्जा मिळण्यात अडथळा येत आहे. मराठी भाषा समितीने 2013 साली अहवाल दिला. त्या अहवालावर साहित्य अकादमीने मराठी भाषेने अभिजाततेचे सर्व निकष पूर्ण केले आहेत, त्या भाषेस अभिजाततेचा दर्जा देण्यास हरकत नाही, अशी शिफारस केंद्राच्या समितीकडे केली; परंतु गेली 8 वर्षे केंद्र सरकारने हा विषय भिजत ठेवला. केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या मराठी साहित्य आणि मराठी भाषेच्या या अवहेलनेचा आपण तीव्र निषेध नोंदवला पाहिजे.” प्रा. हरी नरके म्हणाले, “”मराठी भाषा ही सर्वांत जुनी भाषा असून, या संदर्भातील अनेक अधिकृत ग्रंथ, पोथ्या, शीलालेख उपलब्ध आहेत. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, तुकोबा आदी संतांनी देखील संस्कृतपेक्षा देखील मराठी भाषा जुनी असल्याचे दाखले दिलेले आहेत. आमचे संस्कृत भाषेशी वैर नाही, पण ती आमची आई होऊ शकत नाही. आमची आई मराठी भाषाच आहे, तर संस्कृत ही आमची मावशी आहे.” डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, “”मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी कोणत्याही पक्षाच्या राज्यकर्त्यांनी, शासनकर्त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. कन्नड साहित्यिक कानडी भाषेवर प्रेम करतात, परंतू ते इंग्रजी भाषेत देखील निपूण असतात. असे असले तरी भाषेचा अभिमान बाळगत ते कन्नड साहित्याची निर्मिती करतात.”