नवी दिल्ली – सध्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे ठप्प आहेत; परंतु लॉकडाऊनच्या समाप्तीनंतर पुन्हा नव्याने उद्योग व्यवसाय सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात कोळशाला मागणी होणार आहे. त्यामुळेच 2023-24 साठी एक अब्ज टन कोळसा उत्पादनाचे ध्येय निश्चित केले असून त्यासंबंधीची रणनीती चालू आर्थिक वर्षापासून करण्याचे निर्देश दिले असल्याचे मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले.
कोळसा मंत्रालयाने कोल इंडिया लिमिटेड या कंपनीला 2024 पर्यंत एक अब्ज डॉलरचे कोळसा उत्पादनाचे ध्येय सिद्ध करण्याची योजना तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चालू आर्थिक वर्षातील उत्पादनाचे ध्येय 71 कोटी टन कायम ठेवण्यात यावे, असेही कोळसा मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
त्याप्रमाणे योग्य योजना आखून उत्पादनक्षमता वाढवली जायला हवी. सध्या करोनाच्या संकटामुळे व लॉकडाऊनच्या निर्णयामुळे कोळशाचे उत्पादन बंद आहे; परंतु लॉकडाऊनच्या समाप्तीनंतर वेगाने कोळसा मागणी वाढणार असल्याचे भाकीत कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी व्हिडीओ परिषदेत बोलताना स्पष्ट केले. तेव्हा याची दखल घेऊन उत्पादन वाढवण्याचे नियोजन करावे लागणार आहे.