मुंबई : सध्या तरी मनसे आणि भाजपची युती नाही. कारण दोघांच्या विचारांत आणि कार्यपद्धतीत अंतर आहे तोपर्यंत आमही एकत्र येऊ शकत नाही. मात्र, भविष्यात मनसेची कार्यपद्धती बदलली आणि दोन्ही पक्षांची मनं जुळली तर युती होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भाजपाचे नेते व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात राज ठाकरे यांच्या मनसेशी युती करण्याचे संकेत दिल्यान राज्याच्या राजकारणात एक नव्या समीकरणाची चर्चा सुरु झाली आहे. मंगळवारी राज ठाकरे व फडणवीस यांची परळ येथील एका बिझनेस सेंटरमध्ये गुप्त भेट झाली होती. या भेटीबाबत फडणवीस यांना विचारले असता आमच्या अनेक वेळा भेटी झाले असल्याचे सांगत त्यांनी उत्तर देणे टाळले.
पण मनसेसोबत सध्या तरी युती होणार नाही असे स्पष्ट करताना ते म्हणाले, मनसे आणि भाजपा आज तरी एकत्र येण्याची शक्यता नाही. कारण दोन्ही पक्षांच्या विचारात आणि कार्यपद्धतीत मोठा फरक आहे. जोपर्यंत हे अंतर आहे तोपर्यंत आम्ही एकत्र येउ शकत नाही.
आमचा पक्ष हा राष्ट्रीय पातळीवर काम करतो. आमचा दृष्टीकोन व्यापक असून सर्व घटकांना सोबत घेउन चालण्याचा आहे. मनसेने जर भविष्यात आपला दृष्टीकोन व्यापक केला तर त्या वेळी याचा विचार केला जाउ शकतो, असे सूचक वक्तव्य फडणवीस यांनी केले.
विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे एकाकी पडलेल्या भाजपाने मनसेच्या रूपाने नवीन भिडू जोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील भाजपासोबत जाण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केले होते. येत्या 23 तारखेला मनसेचे महाअधिवेशन आहे. मनसे आपला झेंडा बदलणार असल्याच्या चर्चाही आहेत. त्यामुळे महाअधिवेशनात राज ठाकरे कोणता निर्णय घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.