टोकियो -भारताच्या महिला हॉकी संघाला बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चमकदार कामगिरी करूनही अर्जेंटिनाकडून 2-1 असा निसटत्या पराभवाचा सामना करावा लागला. अर्थात या पराभवानंतरही भारताच्या महिला हॉकी संघाची ग्रेट ब्रिटनशी ब्रॉंझपदकाचा सामना खेळत यंदाच्या स्पर्धेत पदकाची निश्चिती करण्याची संधी कायम आहे.
हा सामना सुरू झाल्यावर दुसऱ्याच मिनिटाला भारताने गोल करत दिमाखात प्रारंभ केला. भारताला यावेळी पेनल्टी कॉर्नर मिळाला होता, त्यावर गुरजित कौरने गोल करत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल झाल्यावर अर्जेंटिनाने आक्रमक खेळ आणखी वाढवला व भारतावर दडपण आणले. मात्र, पंधरा मिनिटांचे पहिले सत्र संपले तेव्हा आघाडी भारताकडेच होती. दुसऱ्या सत्रात मात्र अर्जेंटिनाने गोल केला व सामन्यात 1-1 अशी बरोबरी केली.
अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने हा गोल केला. सामन्याच्या 21 व्या मिनिटाला गोल करण्याची मिळालेली संधी भारताने वाया घालवली. सामन्याचे 27 वे मिनीट अनाकलनीय ठरले. या एकाच मिनिटात पंचांनी तीन पेनल्टी कॉर्नर दिले होते, यामध्ये भारताला दोन, तर अर्जेंटिनाला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता.
दुसऱ्या सत्राचा खेळ झाला तेव्हाही या दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही व हा सामना 1-1 अशाच बरोबरीत राहिला होता. तिसऱ्या सत्रात अर्जेंटिनाची कर्णधार बारिनोवोनेच 36 व्या मिनिटाला गोल केला व सामन्यात 2-1 अशी आघाडी घेतली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राहिली व भारतीय महिला संघाला निसटता पराभव स्वीकारावा लागला. अर्थात, या पराभवानंतरही भारताला ब्रॉंझपदकासाठी ग्रेट ब्रिटनशी खेळावे लागणार असून, त्यात पदक मिळवण्याची संधीही मिळाली आहे.
ऐतिहासिक कामगिरी
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत जरी भारताच्या पुरुष व महिला संघाला सुवर्ण किंवा रजतपदक मिळवण्यात अपयश आले असले तरीही या दोन्ही संघांनी या स्पर्धेत जी कामगिरी केली तीदेखील देशासाठी विक्रमी कामगिरी ठरली. दोन्ही संघांनी तब्बल चार दशकांनंतर या
स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. आता 2024 साली पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्येदेखील संघ चमकदार कामगिरी करेल व त्यासाठी पुढील तीन वर्षे कठोर मेहनत करेल, असा विश्वास दोन्ही संघांच्या खेळाडूंनी व्यक्त केला आहे.