नवी दिल्ली – सुशीलकुमार व योगेश्वर दत्त यांच्याकडून प्रेरणा घेतली व अत्यंत कठोर मेहनत घेतल्यामुळेच 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकू शकले, अशा शब्दांत भारताची अव्वल कुस्तीपटू साक्षी मलिकने आपल्या यशाचे इंगित सांगितले.
लहानपणापासूनच मला कुस्तीबद्दल आकर्षण होते. पुरुषांचाच समजला जात असलेला कुस्ती हा खेळ एक मुलगी खेळते याची उत्सुकता जनसामान्यांना होती. त्यामुळे मी जेव्हा सराव व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला तेव्हा आखाड्यात माझी कामगिरी पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होत होती. माझ्या कुटुंबीयांनीही मला पाठिंबा दिला, त्यामुळेच मी 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझपदक मिळवू शकले, असे साक्षीने सांगितले.
देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे लहानपणापासूनच स्वप्न होते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये मला संधी मिळाली व त्यात मी चमक दाखवू शकले याचे समाधान आहेच, पण ऑलिम्पिकमध्ये देशाला पदक जिंकून दिल्याचा मला सार्थ अभिमान आहे. करोनाच्या धोक्यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्ष पुढे गेल्याने सुरुवातीला निराश झाले होते. मात्र, हा मिळालेला वेळ खेळाडूंसाठी व स्पर्धेच्या तयारी व आणखी काही पात्रता स्पर्धा खेळण्यासाठी मिळाला याचे समाधानही वाटते. आता करोनाचा धोका संपुष्टात आल्यावर ज्या स्पर्धा होतील त्यात सरस कामगिरी करणार, असेही साक्षी म्हणाली.
टॉपमध्ये सातत्याने सहभाग मिळावा …
2016 च्या ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकाने आशा वाढल्या असून माझ्यावरची जबाबदारीही वाढली आहे. माझा टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टॉप) योजनेतही मला स्थान मिळाले. मात्र, या योजनेतून माझ्यासह अन्य काही खेळाडूंना सातत्याने सराव व मार्गदर्शन मिळाले पाहिजे तरच खेळाडू पदक जिंकण्यासाठी सज्ज राहतील, असेही साक्षीने सांगितले.