नवी दिल्ली – इस्तंबूलला मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी गेलेल्या भारताच्या मुष्टियुद्ध संघातील तीन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्य यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यांना इस्तंबूलमध्येच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे व ज्या खेळाडूंच्या करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे ते खेळाडू मायदेशी परतले आहेत.
या तीनही खेळाडूंची तसेच दोन्ही सदस्यांची दुसरी चाचणी घेण्यात आली असून त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. गौरव सोलंकी (57 किलो), ब्रिजेश यादव (81 किलो) आणि दुर्योधन नेगी (69 किलो) हे तीन खेळाडू करोनाबाधित झाले आहेत.
तसेच संघाचे प्रशिक्षक धर्मेंद्र यादव, व्हिडिओ अनालिस्ट व फिजिओथेरपिस्ट यांनाही करोनाची बाधा झाली आहे. भारताच्या एकूण 13 खेळाडूंच्या संघाने येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत निखत झरीन (51 किलो) आणि गौरव सोलंकी (57 किलो) यांनी ब्रॉंझपदक पटकावले होते.