संयुक्त राष्ट्रे – संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला दोन वर्षांच्या मुदतीसाठी अस्थायी सदस्य मिळाले. या अस्थायी सदस्यत्वासाठी 193 सदस्यांच्या आमसभेमध्ये भारताला 184 देशांनी पाठिंबा दिला. भारताबरोबर आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वेलाही या सुरक्षा परिषदेमध्ये सदस्यत्व मिळाले. मात्र कॅनडाला यावेळी परिषदेमध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले. या सदस्यत्वासाठी बुधवारी निवडणूक झाली.
सुरक्षा परिषदेवर निवड होण्यासाठी एकूण सदस्यांच्या एकतृतीयांश मतांची आवश्यकता असते. आयर्लंडला 128, केनियाला 113 मते मिळाली. नॉर्वेला पश्चिम युरोप आणि अन्य देशांच्या श्रेणीतून 130 मते मिळाली. फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, रशिया आणि चीन हे पाच देश सुरक्षा परिषदेचे कायम सदस्य आहेत. या पाच देशांना नकाराधिकारही आहे. या परिषदेमधील अन्य 10 रिक्त जागांसाठी आळीपाळीने अन्य सदस्य देशांना संधी दिली जाते. त्यांना दोन वर्षांची मुदत असते.
आशिया प्रशांत श्रेणीतून 2021-2022 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यत्वासाठी भारताची उमेदवारी होती. या श्रेणीतून परिषदेवर सदस्यत्व मिळवण्यासाठी भारत एकमेव उमेदवार होता. त्यामुळे या निवडणुकीत भारताचा विजय निश्चित मानला जात होता. 55 सदस्यांच्या आशिया प्रशांत गटात भारताच्या उमेदवारीला गेल्या वर्षी जूनमध्ये एकमताने पाठिंबा देण्यात आला होता. याच गटामध्ये चीन आणि पाकिस्तानही आहेत. यापूर्वी 1950-1951, 1967-68, 1972-73 1977-78, 1984-85, 1991-92 आणि सर्वात अलिकडे 2011-12 या काळात भारताला सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्यत्व मिळाले होते.
संयुक्त राष्ट्राच्या 74 व्या सत्राचे अध्यक्ष तिजानी मोहंम्मद बान्डे यांनी सोशल मीडियावरून भारताचे अभिनंदन केले आहे. बुधवारी झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये 75 व्या सत्रासाठीचे अध्यक्षपद, सुरक्षा परिषदेवरील 5 कायम सदस्य आणि आर्थिक आणि सामाजिक परिषदेवरील सदस्यांसाठीचीही निवडणूक झाली. करोना विषाणूच्या साथीमुळे असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीसाठी मतदानाची विशेष योजना करण्यात आली होती.