नवी दिल्ली – श्रीलंकेत उद्भवलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने श्रीलंकेतील जनतेला पाठिंबा जाहीर केला आहे. श्रीलंकेतील जनतेला समृद्धी आणि प्रगती मिळवण्याची मागणी लोकशाही मार्गांनी केली जाते आहे. लोकशाही मूल्ये टिकवण्याचा आणि राज्यघटनेच्या चौकटीत हा प्रयत्न असल्याचे भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेतील घडामोडींकडे भारत बारकाईने लक्ष देऊन आहे. श्रीलंकेपुढे आणि तेथील नागरिकांपुढे सध्या असलेली अनेक आव्हाने भारताला माहिती आहेत, असेही बागची यांनी म्हटले आहे. सध्याच्या कठिण प्रसंगावर मात करण्याचा प्रयत्न श्रीलंकेतील जनता करत असल्याचेही बागची यांनी म्हटले आहे.
आर्थिक आपत्तीच्या काळात भारताने श्रीलंकेला आर्थिक मदत केल्याचा उल्लेखही बागची यांनी केला. “नेबरहूड फर्स्ट’ या धोरणाला अनुसरून भारताने श्रीलंकेला यावर्षी 3.8 अब्ज डॉलरची मदत केली आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, श्रीलंकेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी संतप्त निदर्शक घुसल्यानंतर अध्यक्ष गोटाबाये राजपक्षे यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. विक्रमसिंघे यांचे खासगी निवासस्थान पेटवून देण्याचाही प्रयत्न निदर्शकांनी केला होता.