मुंबई – आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ दुसऱ्या फळीतील खेळाडूंसह मैदानात उतरेल, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ पात्र ठरल्यामुळे त्याच जून महिन्यात होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धेत भारताचा प्रमुख खेळाडूंचा संघ सहभागी होऊ शकत नसल्याने बीसीसीआय हा निर्णय घेण्यावर विचार करत आहे.
या स्पर्धेनंतर भारतीय संघ तेथेच राहणार असून यजमान इंग्लंडविरुद्ध त्यांच्याच भूमीत कसोटी मालिका खेळणार असल्याने भारतीय संघ इंग्लंडमध्येच मुक्काम करणार आहे. 18 ते 22 जूनदरम्यान साउदम्पटन येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतील स्थान भारताने निश्चित केले. मात्र, जून महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेत आशिया करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ऑगस्टपासून भारत व इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
भारताचे खेळाडू जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याला प्राधान्य देणार असून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तेथेच थांबण्याची शक्यता आहे. आशिया करंडकासाठी श्रीलंकेला रवाना झाल्यास भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यापूर्वी पुन्हा विलगीकरणाला सामोरे जावे लागेल. मात्र, आशिया करंडक स्पर्धा पुढे ढकलण्याचा पर्यायही योग्य ठरत नसल्याने भारताचा दुसऱ्या फळीतील संघ आशिया करंडक स्पर्धेत उतरण्यात येणार असल्याचे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत.
बायोबबल सुरक्षेचा तसेच विलगीकरणाच्या नियमांचा विचार करता भारत किमान 20 ते 25 खेळाडूंसह इंग्लंडला जाणार, हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक चहर, यजुर्वेद्र चहल, टी. नटराजन यांसारखे मर्यादित षटकांच्या सामन्यातील खेळाडू आशिया करंडक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करू शकतात. ऑक्टोबर महिन्यात भारतात होणाऱ्या टी-20 विश्वकरंडकाच्या पार्श्वभूमीवर यंदा आशिया करंडक स्पर्धाही टी-20 प्रकारातच खेळवण्यात येणार आहे.
भारताच्या या निर्णयावर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी आयसीसीकडेही याबाबत तक्रार केली आहे. केवळ भारतीय संघाचा सहभाग असल्यामुळेच आयसीसीला लाभ होतो त्यामुळेच ते याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी टीका पाकिस्तान क्रिकेट मंडळाने केली आहे.