लंडन – अफगाणिस्ताबोबत अमेरिकेने केलेल्या योगदानामध्ये भारताची भूमिका महत्वाची आहे. तसेच अफगाणिस्तानच्या भविष्याबाबतही भारताची भूमिका महत्वाची आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. न्यूयॉर्कवर झालेल्या 9-11 या भीषण दहशतवादी हल्ल्याला 20 वर्षे पूर्ण होत असताना पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झेड तरार यांनी हे प्रतिपादन केले.
9-11 च्या हल्ल्याला कारणीभूत असलेल्या अल कायदाचा अफगाणिस्तानमधून सफाया करण्याचे उद्दिष्ट अमेरिकेच्या मोहिमेने पूर्ण केले आहे, या अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार तरार यांनी केला. आता अफगाणिस्तानच्या फेरउभारणीमध्ये भारतासारख्या समविचारी देशांबरोबर मिळून दुसरा अध्याय सुरू करण्याची वेळ आली आहे, असेही तरार यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी निवडल्या गेलेल्या भारताची भूमिका महत्वाची असणार आहे. या संदर्भात अमेरिका आणि भारताच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. अमेरिकेने आपले सैन्य माघारी घेण्याच वेळ आणि प्रक्रिया चुकली असा आरोप केला जात आहे. मात्र अमेरिकेने सैन्य माघारी घेण्याचीच वेळ आली होती, असे तरार यांनी जोर देऊन सांगितले.