भारताला दिली पुन्हा एकदा अणु हल्ल्याची धमकी
नवी दिल्ली : पाकिस्तानकडून दोन दिवसापुर्वी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. मात्र पाकच्या या कारवाईला भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर दिले. दरम्यान, भारताने पाकला दिलेल्या उत्तराने आता पाकचा तांडव सुरू झाला आहे. एवढेच नाही तर पुन्हा एकदा पाकने भारताला अणुहल्ला करण्याची धमकी दिली आहे.
आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असलेले पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताचे नाव न घेता पुन्हा एकदा अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. आता केवळ अण्विक युद्ध होईल, परंपरागत पद्धतीने युद्ध केले जाणार नाही, अशी पोकळ धमकी रशीद यांनी दिली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही धमकी दिली. आता 4-5 दिवस टॅंक, तोफा चालतील असे युद्ध केले जाणार नाही, आता केवळ अण्विक युद्ध होईल, असे रशीद यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
यापूर्वी मी 126 दिवस आंदोलनात सहभागी होतो. त्यावेळी देशातील परिस्थिती वेगळी होती. आता एअर टॅंकने हल्ला किंवा नौदलाकडून हल्ला केला जाणार नाही. आता केवळ अण्विक युद्ध होईल आणि ज्याप्रकारची गरज असेल त्या प्रकारे अण्विक हल्ला केला जाईल, असेही ते म्हणाले. यापूर्वीही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेल्या धमकीनंतर शेख रशीद यांनी भारताला अण्विक हल्ल्याची धमकी दिली होती. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून यासंदर्भात एक व्हिडीओ शेअर केला होता.