नवी दिल्ली, दि. 12 – “आसियान’ संघटनेतील सर्व 10 देशांबरोबर सामाजिक, डिजीटल आणि वित्तीय संलग्नता वाढवण्यास भारताचे प्राधान्य असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत आणि “आसियान’दरम्यानच्या आभासी परिषदेदरम्यान त्यांनी हे प्रतिपादन केले.
सर्वच क्षेत्रात सुरक्षा आणि विकासासाठी संलग्न आणि उत्तरदायी संघटना म्हणून “आसियान’ संघटनेवर आमचा भरवसा आहे. भारताची भारत-प्रशांत प्राधान्य आणि “आसियान’च्या “आऊटलुक् ऑन इंडो पॅसिफिक’धोरणांमध्ये खूप साधर्म्य आहे. भारत आणि आसियान यांच्यातील राजनैतिक भागीदारी आमच्या सामाईक, ऐतिहासिक, भौगोलिक आणि सांस्कृतिक वारशांच्या अनुबंधांवर आधारलेली आहे. आसियान समूह सुरुवातीपासूनचा आमच्या ऍक्ट इस्ट धोरणाचे मूळ केंद्र राहिले आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
भारत आणि आसियान यांच्यात प्रत्यक्ष, आर्थिक, सामाजिक, डिजिटल, वित्तीय किंवा सागरी अशा सर्व प्रकारचा संपर्क वाढवण्याला आमचे प्राधान्य आहे. गेल्या काही वर्षात, आम्ही या सर्वच क्षेत्रात अधिकाधिक जवळ आलो आहोत. ही चर्चा आमच्यातले अंतर कमी करण्यासाठी लाभदायक ठरेल, असा आपल्याला विश्वास वाटत असल्याचेही पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
“आसियान’ या अग्नेय आशियातील देशांच्या संघटनेमध्ये भारताव्यतिरिक्त इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलॅंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया हे सदस्य देश आहेत. दक्षिण चीन समुद्रामध्ये तसेच पूर्व लडाखमधील चीनच्या आक्रमक वर्तनाच्या पार्श्वभुमीवर ही परिषद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेच्या सहअध्यक्षपदी आहेत.