नवी दिल्ली – आगामी 8 वर्षात भारताची लोकसंख्या चिनपेक्षा जास्त असणार आहे असा अहवाल संयुक्त राष्ट्राने दिला आहे. संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोस्पेक्टस 2019च्या रिपोर्टनुसार सध्या भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे तर चीनची लोकसंख्या 143 कोटी आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी चीनमध्ये 19 टक्के लोकसंख्या तर भारतात 18 टक्के लोकसंख्या राहते.
संयुक्त राष्ट्राच्या द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रोसपेक्टस 2019च्या रिपोर्टनुसार जगातील लोकसंख्येत वाढ ही 9 देशांतील वाढीमुळे होणार आहे. भारत, नायजेरिया, पाकिस्तान, कॉंगो, इथिओपिया, तंजानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका. भारत 2027 पर्यंत चीनला मागे टाकत जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनणार आहे. त्यामुळे 2050 पर्यंत जगातील लोकसंख्येत तब्बल 20 कोटींनी वाढ होईल आणि एकूण लोकसंख्या वाढून 970 कोटी होईल.
या रिपोर्टनुसार जनसंख्येसोबतच लोकांचे वयही वाढत आहे. 2050 पर्यंत प्रत्येक 6 पैकी एक व्यक्ती 65 वर्षापेक्षा अधिक वयाची असेल. याचा अर्थ जगात केवळ 16 टक्के लोक वृद्ध असतील. यूएनच्या रिपोर्टनुसार या शतकाच्या अखेरीपर्यंत भारताची लोकसंख्या 150 कोटी होईल. तर लोकसंख्या नियंत्रण करण्याच्या योजनांमुळे चीनची लोकंख्या 110 कोटींवर थांबेल. तर 73.7 कोटी लोकसंख्येसह नायजेरिया तिसऱ्या, 43.40 कोटींसह अमेरिका चौथ्या आणि 40.30 लोकसंख्येसह पाकिस्तान पाचव्या स्थानावर असेल.