– अमित डोंगरे
भारताचा ऑलिम्पिक पात्र कुस्तीपटू बजरंग पुनियाने मॅट्टेओ पेलीकोन मानांकन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानही मिळवले. त्याच्या या कामगिरीमुळे आता आगामी टोकियो ऑलिम्पिकमधील पदकाची आशा वाढली आहे.
बजरंग हा बचावात कमी पडतो अशी ओरड गेली अनेक वर्षे होत होती. त्यातच करोनाच्या संकटामुळे स्पर्धाही होत नव्हत्या. खेळाडू घरात बसून सरावाविना अत्यंत निराश झाले होते. मात्र, बजरंगने या संकटाचे संधीत रूपांतर केले व पायाच्या बचावातील सुधारणेवर भर दिला. त्याचा प्रत्यय या स्पर्धेत आला. कुस्तीचा खेळ हा प्रत्येक कुस्तीपटूसाठी विजयाच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा असतो तेवढाच प्रतिस्पर्धी खेळाडूला दडपणाखाली ठेवण्यासाठीही महत्त्वाचा असतो. समोरच्या खेळाडूला मानसिकरीत्या खच्ची करण्यात यश मिळवले तरच सामना जिंकता येतो.
या स्पर्धेत बजरंगने नेमके हेच केले. त्याने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मंगोलियाच्या बलाढ्य तुल्गा तुमुर ओशिरचा पराभव करताना त्याला सातत्याने दडपणाखाली ठेवले. बजरंग या स्पर्धेच्या आधीच जपानमध्ये होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरला असल्याने या स्पर्धेत त्याच्यावर कोणतेही दडपण नव्हते. तरीही त्याने जवळपास एक वर्षांच्या फंडानंतर स्पर्धात्मक कुस्तीत सहभाग घेतला होता, त्यामुळे त्याची कामगिरी कशी होते याकडे कुस्ती शौकिनांचे लक्ष लागले होते. त्यानेही अफलातून कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले व चाहत्यांना निराश केले नाही. या सामन्याला लढत म्हणावी असे काहीही झाले नाही.
बजरंगने हा सामना केवळ अर्ध्या तासातच जिंकला. या विजयाच्या जोरावर त्याने सुवर्णपदक तर जिंकलेच पण दुहेरी यश मिळवताना जागतिक क्रमवारीतील अग्रस्थानही कायम राखले. 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत तुल्गा तुमूर ओशिरचे पारडे जड मानले जात होते. कारण याआधीच्या दोन्ही लढतीत ओशिरकडूनच बजरंगला पराभव पत्करावे लागले होते. मात्र, यावेळी हा पराभूत शिक्का त्याने पुसून काढला व विजयावर मोहोर उमटवली. ही स्पर्धा झाली असली तरीही बजरंगवरची जबाबदारी मात्र, आता वाढली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी त्याला बचावावर अपार मेहनत घ्यावी लागणार आहे. बजरंगचे वय 27 वर्षे असून आता कदाचित तो आपले अखेरचे ऑलिम्पिक खेळत आहे असेच म्हणावे लागेल. त्यामुळे देशाला कुस्तीत ऑलिम्पिकचे सुवर्णपदक मिळवून देण्याचे खडतर आव्हान त्याला पार करायचे आहे. त्यापूर्वी त्याला सरावासाठी आणखी एक मोठी संधी मिळाली आहे. येत्या 9 ते 11 एप्रिल या कालावधीत कझाकिस्तानला आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा होत असून त्यातही बजरंग सुवर्णयशासाठीच सहभागी होणार आहे. त्यात तो यशस्वी झाला तर टोकियोतही त्याची पुनरावृत्ती करण्याची त्याच्यावरील अपेक्षा वाढणार आहे.
65 किलो वजनी गटात बजरंग सहभागी होत असला तरीही या गटात त्याच्यासमोर जागतिक दर्जाच्या अनेक मातब्बर खेळाडूंचे आव्हान असणार आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंगने सुवर्ण कमाई केली होती. हे पदक या स्पर्धेतील भारतीय खेळाडूचे पहिले वहिले पदक ठरले होते. भारतातील मानाचे समजले जाणारे अर्जुन, खेलरत्न तसेच पद्मश्री असे पुरस्कारही त्याने पटकावले आहेत. आता टोकियो ऑलिम्पिकचे सुवर्णपदकही त्याच्यासाठी अखेरची संधी असेल.
आजवर त्याने जागतिक, आशियाई, राष्ट्रकुल तसेच विविध वयोगट स्पर्धेत पदके मिळवलेली आहेत. एकूण 17 पदके पटकावली आहेत. त्यात 7 सुवर्ण, 6 रजत व 4 ब्रॉंझ अशी त्याची कामगिरी आहे. यात आता केवळ एका ऑलिम्पिक पदकाची आवश्यकता आहे आणि ती अपेक्षा टोकियोत पूर्ण होईल अशी आशा आहे.