मुंबई – भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला अखेर दुखापतीमुळे आगामी आशिया करंडक स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या दुखापतीचे स्वरूप पाहता त्याला ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतही खेळता येणार का असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
बुमराहच्या पाठीच्या दुखण्याने पुन्हा एकदा डोके वर काढल्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण आहे. त्याला जर विश्वकरंडक स्पर्धेत खेळता आले नाही तर ते भारतीय संघासाठी नुकसानकारक ठरू शकते. यंदाची टी-20 विश्वकरंडक स्पर्धा येत्या ऑक्टोबर व नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात होत आहे. त्यासाठी सध्या बारतीय संघ विविध मालिकांमधून सराव करत आहे, तसेच संघातील नवोदितांनाही वेळोवेळी संधी देत प्रयोगही करत आहे. मात्र, बुमराह जर पूर्ण तंदुरुस्त ठरला नाही तर त्याची उणिव कोणता गोलंदाज भरून काढणार यावर सध्या चर्चा सुरु आहे.
आता त्याच्या दुखापतीवर उपाय काढण्यासाठी त्याला लवकरच राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) पाठवले जाणार आहे. याच पाठिच्या दुखण्यामुळे त्याचा आशिया करंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. 2019 साली त्याला या दुखापतीचा त्रास झाला होता. बीसीसीआय आणि निवड समिती सदस्यही चिंतेत आहेत.
टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ जवळपास एक महिन्याने जाहिर केला जाणार असून त्यापूर्वी बुमराहबाबत सकारात्मक वृत्त यावे अशी अपेक्षा बीसीसीआयने व्यक्त केली आहे.