लीड्स – भारतीय संघाचा डाव लीड्स कसोटीत पहिल्याच दिवशी अवघ्या 78 धावांवर संपला. इंग्लंडविरुद्ध भारताची ही तिसरी सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. याआधी 1974 साली लॉर्डस कसोटीत भारताचा डाव केवळ 42 धावांत तर, 1952 साली झालेल्या मॅंचेस्टर कसोटीत 58 धावांवर संपला होता. आता 47 वर्षानंतर या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडमध्ये अत्यंत दारूण कामगिरी केली आहे.
भारतीय संघाचे अखेरचे पाच फलंदाज अवघ्या 11 धावांत बाद झाले. एकवेळ 5 बाद 67 अशा स्थितीतून भारतीय संघ अखेरपरपर्यंत सावरलाच नाही. त्यानंतर भारताचा डाव 78 धावांवर अटोपला.
कसोटी क्रिकेटमधील भारताची ही नववी नीचांकी धावसंख्या आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ऍडलेडमध्ये भारताचा डाव 36 धावांवर संपला होता. मात्र, त्यानंतर भारतीय संघाने थाटात पुनरागमन करताना ही मालिका 2-1 अशी जिंकली होती. या कसोटीत खेळपट्टीचा रागरंग ओळखण्यात कोहली चुकला. नाणेफेकीचा कौल कोहलीने जिंकला.
संघातील वेगवान गोलंदाजांचा फॉर्म पाहता तो प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल असे वाटले होते मात्र, त्याने फलंदाजी स्वीकारली व तीथेच चुक झाली. खेळपट्टीवरील दव आणि थंड वारा याचा पुरेपुर लाभ इंग्लंडच्या गोलंदाजांनी घेतला व त्यांच्यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. कोहलीने प्रथम गोलंदाजी स्विकारली असती तर चित्र हेच मात्र इंग्लंडच्या संघाबाबत दिसले असते.