नवी दिल्ली – भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि तिचा इतिहास मानवी हक्कांसाठी आणि भारताच्या मानवी हक्कांच्या मूल्यांसाठी मोठा प्रेरणादायी स्त्रोत आहे. असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
एक राष्ट्र म्हणून, एक समाज म्हणून आपण अन्याय-अत्याचाराचा प्रतिकार केला, अनेक शतके आपण आपल्या हक्कांसाठी लढलो. ज्या वेळी संपूर्ण जग पहिल्या महायुद्धाच्या हिंसाचाराने घेरले होते, तेव्हा भारताने संपूर्ण जगाला ‘हक्क आणि अहिंसा’ चा मार्ग सुचवला.
केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग आपल्या बापूंकडे मानवाधिकारांचे आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून पाहते, असे सांगत पंतप्रधानांनी महात्मा गांधींचे स्मरण केले. अनेकदा जेव्हा जगाचा भ्रमनिरास झाला आणि गोंधळ उडाला, तरीही भारत स्थिर राहिला आणि मानवी हक्कांप्रति संवेदनशील राहिला, असेही ते म्हणाले.
मानवी हक्कांची संकल्पना गरीबांच्या प्रतिष्ठेशी अधिक निगडित आहे. जेव्हा सर्वात गरीब व्यक्तीला सरकारी योजनांमध्ये समान वाटा मिळत नाही तेव्हा अधिकारांचा प्रश्न उद्भवतो. पंतप्रधानांनी गरीबांचा सन्मान करणाऱ्या स्वच्छता, जनधन बॅंक खाती आणि रुपे कार्ड, उज्ज्वला गॅस जोडणी आणि महिलांसाठी पक्क्या घरांचे मालमत्ता हक्क यासारख्या योजनांची यशस्विताही यावेळी विषद केली.
मानवी हक्कांची आपापल्या परीने आपल्या हितासाठी निवडक व्याख्या करणाऱ्यांविरुद्ध आणि देशाची प्रतिमा मलिन करण्यासाठी मानवी हक्कांचा वापर करण्याविरोधात सावध राहण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली. काही लोकांनी त्यांच्या स्वार्थाप्रमाणे मानवी हक्कांचा अर्थ त्यांच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून लावायला सुरुवात केली आहे.
एकाच प्रकारच्या घटनेत काही लोकांना मानवाधिकारांचे उल्लंघन झालेले दिसते तर दुसऱ्या घटनेत मानवाधिकारांचे उल्लंघन झालेले दिसत नाही. अशा प्रकारच्या मानसिकतेमुळे मानवाधिकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मानवाधिकारांचे सर्वात मोठे उल्लंघन तेव्हा होते जेव्हा राजकारणाच्या लोलकातून आणि राजकीय फायदा तोट्याच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले जाते. हे सोयीचे ,निवडक वर्तन लोकशाहीसाठी तितकेच हानिकारक आहे,अशा शब्दांत पंतप्रधानांनी सावधगिरीचा इशारा दिला.
मानवी हक्क केवळ अधिकारांशी संबंधित नाही तर तो आपल्या कर्तव्यांचाही विषय आहे. हक्क आणि कर्तव्ये हे दोन मार्ग आहेत ज्यावर मानवी विकास आणि मानवी प्रतिष्ठेचा प्रवास सुरू राहतो. कर्तव्ये हक्कांइतकीच महत्वाची आहेत आणि ती एकमेकांना पूरक असल्याने त्यांची स्वतंत्रपणे चर्चा केली जाऊ नये यावरही त्यांनी भर दिला.