श्रीनगर – दहशतवाद्यांशी विशेषत: जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांशी लढताना भारतीय जवानांच्या अनेक जवानांना प्राणांची आहुती द्यावी लागली आहे. दहशतवाद्यांकडे अत्यंत आधुनिक शस्त्रे असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मात्र तरीही बुलेटप्रुफ जॅकेट एका कवचाचे काम करायचे. त्यामुळे जवानांची सुरक्षा होत होती. आता नवीन समोर आलेल्या माहितीनुसार हे कवचही आता निकामी ठरण्याची शक्यता असल्यामुळे लष्कराला नव्या जॅकेटची ऑर्डर देणे भाग पडले आहे.
उपलब्ध माहितीनुसार दहशतवाद्यांच्या हाती बुलेटप्रुफ जॅकेटलाही भेदू शकतात अशा गोळ्या लागल्या आहेत. या गोळ्या अफगाणिस्तानातून आल्या आहेत. अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तानातून काढता पाय घेतला तेव्हा ती आपली शस्त्रे आणि अन्य दारूगोळ तेथेच ठेवुन बाहेर पडली. आता हा शस्त्रसाठा अफगाणिस्तानच्या कथित सरकारच्या हाती लागला असून त्यातच या गोळ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे बुलेटप्रुफ जॅकेट घालूनही या दहशतवाद्यांचा मुकाबला करणे आता धोक्याचेच ठरणार आहे.
भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक एप्रिल महिन्यात झाली होती. त्यात या गंभीर मुद्दयावर चर्चा करण्यात आली आहे. अलिकडच्या काळात दहशतवाद्यांसोबत झालेल्या काही चकमकींमध्ये दहशतवाद्यांनी याच गोळ्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, आता नव्या जॅकेटस्ची मागणी करण्यात आली असून ती लवकरच उपलब्ध होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हे जॅकेटस् गोळीपासून संरक्षण प्रदान करण्यात उपयुक्त ठरले असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
अमेरिकेची शस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागली तर त्याचा निश्चितपणे भारताच्या विरोधात उपयोग केला जाऊ शकतो, अशी भीती अगोदरच व्यक्त केली गेली होती. ती भीती अखेर खरी ठरली आहे.