पुणे – भारताने कझाकिस्तानमध्ये झालेल्या 12 वर्षाखालील गटाच्या आशियाई टेनिस स्पर्धेतील मुलांच्या गटात सुवर्णपदक जिंकले. मानस धामणे व अर्णव पापरकर या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधित्व केले.
भारताने अंतिम फेरीत चीन तैपेई संघाचा 2-1 असा पराभव केला. या लढतीमधील एकेरीच्या दोन्ही सामन्यांमध्ये मानस व अर्णव यांनी विजय संपादन केला. भारताने साखळी गटात सातत्यपूर्ण कामगिरी केली. मानसने या स्पर्धेत एकेरीचा एकही सामना गमावला नाही. हे दोन्ही खेळाडू महाराष्ट्र टेनिस अकादमीत आदित्य मडकईकर व कैफी अफझाई यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. मानस व अर्णव यांनी आजपर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक मानांकन स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविले आहे.