नवी दिल्ली – श्रीलंकेच्या लोकशाही, स्थैर्य आणि आर्थिक पुनर्व्यवस्थापनाला आपला पूर्णपणे पाठिंबा असल्याचे भारताने मंगळवारी सांगितले. आर्थिक संकटाच्या हाताळणीच्या मुद्यावरून देशभर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यापार्श्वभुमीवर भारताने आपली भुमिका स्पष्ट केली आहे.
लोकशाही प्रक्रियेद्वारे व्यक्त केलेल्या श्रीलंकेतील लोकांच्या सर्वोत्तम हितासाठी भारत नेहमीच मार्गदर्शन करेल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले आहे. श्रीलंकेतील घडामोडींवर प्रसिद्धी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.
श्रीलंकेचा जवळचा शेजारी आणि श्रीलंकेबरोबर असलेले ऐतिहासिक संबंध लक्षात घेता तेथील लोकशाही, स्थैर्य आणि आर्थिक पुनरुत्थानासाठी भारताचा पूर्ण पाठिंबा आहे, असे बागची म्हणाले.
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी भारताने केलेल्या मदतीचाही उल्लेख बागची यांनी यावेळी केला. आमच्या “नेबरहुड फर्स्ट’ धोरणानुसार, भारताने या वर्षी श्रीलंकेच्या लोकांना त्यांच्या सध्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी मदत करण्यासाठी 3.5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीची मदत दिली आहे, बागची म्हणाले.