संयुक्तराष्ट्रे – संयुक्तराष्ट्र संघाच्या एका संस्थेने तयार केलेल्या एका अहवालानुसार जगात तयार अन्न वाया घालवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून सन 2019 मध्ये जगभरातून एकूण 931 दशलक्ष टन अन्न वाया गेले आहे. भारतात या वाया घालवण्यात आलेल्या अन्नाचे प्रमाण 68.7 दशलक्ष टन इतके आहे.
सन 2021चा जो फूड इंडेक्स रिपोर्ट सादर करण्यात आला आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे. यातील 61 टक्के अन्न घरगुती स्वरूपातील आहे, तर 26 टक्के अन्न हॉटेल व अन्नसेवा क्षेत्राचे आहे. आणि 13 टक्के वाया गेलेले अन्न रिटेल क्षेत्राचे आहे. याचा अर्थ एकूण जागतिक अन्न उत्पादनापैकी 17 टक्के उत्पादन हे अक्षरश कचराकुंडीत जाते आहे.
या वाया जाणाऱ्या अन्नाचे नेमके वजन लक्षात येण्यासाठी या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, 40 टनी 23 दशलक्ष ट्रक या अन्नाने पुर्ण भरतात. भारतातही वाया जाणाऱ्या अन्नाचे प्रमाण लक्षणीय असून भारतात दरवर्षी 68760163 टन अन्न वाया जाते. हे प्रमाण प्रति व्यक्ती सरासरी 50 किलो इतके आहे. अमेरिकेत हे प्रमाण प्रती व्यक्ती 59 किलो इतके आहे. तर चीन मध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचे प्रमाण दर माणशी दर वर्षी 64 किलो इतके आहे.
कमी उत्पन्न गटाच्या लोकांमध्ये अन्न वाया घालवण्याचे प्रमाण कमी असेल असे वाटले होते पण या अभ्यासात मात्र तसे काही आढळून आले नाही. गरीब आणि श्रीमतांमध्ये अन्न वाया घालवण्याची सवय जवळपास सारखीच असल्याचे दिसून आले आहे. अन्न सेवा देणाऱ्या केंद्रांमध्ये 5 टक्के इतके आणि किरकोळ विक्री केंद्रांमध्ये सरासरी 2 टक्के इतके अन्न वाया जात असते.
या वाया जाणाऱ्या अन्नाच्या प्रमाणावर जगातल्या सर्वच देशांनी नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे असे आवाहन युएनईपीचे कार्यकारी संचालक इंगर अँडरसन यांनी केले आहे. त्यांनी म्हटले आहे की या वाया जाणाऱ्या अन्नाचा विपरित दुष्परिणाम वातावरणातील बदल, जैव वैविध्यातील नुकसानीला कारणीभूत ठरत आहेत. त्यातून प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढत असते असे त्यांनी म्हटले आहे.