नवी दिल्ली – दहा वर्षांपूर्वी भारत जगातील 11 वी अर्थव्यवस्था होता. मात्र दहा वर्षांमध्ये केंद्र सरकार आणि जनतेने केलेल्या प्रयत्नामुळे भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर आहे. ही सोपी गोष्ट नाही. हे भारतीय जनतेच्या कर्मनिष्ठेमुळे झाले आहे आणि याचे श्रेय भारतीयांनी घेतले पाहिजे असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार आता भारत अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जपान आणि चौथ्या क्रमांकावर जर्मनी आहे. दहा वर्षांपूर्वी पाचव्या क्रमांकावर ब्रिटन आणि 11 क्रमांकावर भारत होता. दहा वर्षात भारतीय जनतेने केलेल्या परिश्रमामुळे हे उद्दिष्ट साध्य करता आले आहे. विशेष म्हणजे या दहा वर्षात दोन वर्षे वाया गेली आहेत. कारण या दोन वर्षांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला होता.
त्यामुळे अनेक देशांची अर्थव्यवस्था वाढण्याऐवजी अंकुचन पावली होती. भारतावरही या घडामोडीचा परिणाम झाला होता. मात्र भारताने अशा परिस्थितीतही खचून न जाता उत्तम काम केले. करोनानंतर अर्थव्यवस्था किती वेगाने वाढली आहे याबाबत मतभेद असू शकतात. मात्र भारताचा विकासदर जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे हे सर्वमान्य आहे.
भारताने करोना काळात योग्य कामगिरी केल्यामुळेच भारत वेगाने विकास करत आहे. इतर देश अजूनही चाचपडत आहेत. आपण एखादी गोष्ट साध्य केली तरी स्वतःला कमी लेखण्याची पद्धत काहीजण अंगीकारतात. मात्र हा दृष्टिकोन सोडून आपण मिळविलेल्या यशाचे श्रेय आपण घेतले पाहिजे. अर्थव्यवस्था वाढीचे श्रेय सर्वसामान्यांना जाते असे त्या म्हणाल्या.
आपण सर्वांनी या घटनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर टीका करत बसल्यामुळे नकारात्मक वातावरण निर्माण होते. भारत सरकारने आणि भारतीय जनतेने प्रयत्न केल्यामुळेच आपण डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करू शकलो आहोत. त्याचबरोबर अतिशय कठीण परिस्थितीत लस तयार करून ती सर्वांना देण्यात आली. त्यामुळे भारतीय मनुष्यबळाची जास्त हानी झाली नाही. त्याचा अर्थव्यवस्थेला लाभ होत आहे.