नवी दिल्ली – कच्च्या तेलाच्या दरातील अस्थिरतेबाबत भारताला वाटणारी गंभीर चिंता तेल उत्पादक देशांना कळविण्यात येत असल्याचे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी सांगितले.
कच्चे तेल उत्पादन करणारे देश, पेट्रोलियम उत्पादने निर्यातदार संघटना आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील इतर संबंधित मंचांच्या प्रमुखांपर्यंत ही बाब पोहोचविण्यासाठी सरकार द्विपक्षीय चर्चेचा मार्ग अनुसरत आहे.
तेली यांनी राज्यसभेत सांगितले की, वर्ष 2045 पर्यंत भारतातील तेलाची मागणी प्रतिदिन 11 दशलक्ष बॅरल इतकी वाढेल अशी अपेक्षा आहे. सद्यस्थितीला देशात प्रतिदिन 4.9 दशलक्ष बॅरल तेलाची गरज भासते आहे.
देशाला उर्जा सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टीने सरकार तामिळनाडूसह सर्वच राज्यांमध्ये देशांतर्गत तेल उत्पादन वाढविण्यासाठी विविध पावले उचलत आहे. यामध्ये आयात स्त्रोतांसाठी नव्या देशांकडे आणि प्रदेशांकडे वळणे, इथेनॉल मिश्रण कार्यक्रम इत्यादीचा समावेश आहे. इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायोगॅस, हायड्रोजन इत्यादी इंधन प्रकारांच्या वापरातून पारंपरिक हायड्रोकार्बन इंधनाला पर्याय ठरणारे विविध उर्जा स्रोत स्वीकारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.