नवी दिल्ली – भारतातील करोनाबाधितांनी 900 चा आकडा ओलांडला. देशात शनिवारी तब्बल 179 नवे रूग्ण आढळले. तो भारतातील एकाच दिवसातील उच्चांक ठरला आहे. दरम्यान, देशातील करोनाबाधितांची संख्या 923 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत करोनाने 19 रूग्णांचा बळी घेतला आहे.
देशात सर्वांधिक करोनाबाधित महाराष्ट्रात आढळले आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये 176 रूग्णांची नोंद झाली आहे. उत्तरप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, राजस्थान या राज्यांतील करोनाबाधितांच्या संख्येने पन्नाशी ओलांडली आहे. गुजरात, दिल्ली, तामीळनाडू, पंजाबमधील रूग्णांची संख्या 40 च्या आसपास आहे.
भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये 47 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध राज्यांनी काही दिवसांपासून विविध निर्बंध लागू केले. केंद्र सरकारनेही 21 दिवसांचा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. त्या लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणा सरसावल्या आहेत. करोनाविरोधी लढ्यासाठी आता संपूर्ण देश सज्ज झाला आहे.