सिडनी: जगात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचा भारतात मात्र चांगलाच उद्रेक झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाला पूर्णपणे खिळखिळे करण्याचे कामच सुरु केल्याचे दिसत आहे. दरम्यान, देशातील याच परिस्थितीचा जगाला धडकी भरली आहे. कारण अनेक देशांनी भारतातून मायदेशी परतणाऱ्या आपल्या नागरिकांवर काही निर्बंध घातले आहेत. याच यादीत आता ऑस्ट्रेलियाचा देखील समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलियाने केवळ भारतीय प्रवाशांवरच नाही तर ऑस्ट्रेलियन नागरिकांवरही भारतातुन स्वदेशी परतण्यासंबधी मोठा निर्णय घेतला आहे.
जगात सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून त्याचे परिणाम जगाला देखील सोसावे लागणार असल्याच्या भीतीने अनेक देशांनी आपापल्या परीने निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून भारतात मागच्या १४ दिवसापासून वास्तव्यास असणाऱ्या ऑस्ट्रेलियन नागरिकांना आता मायदेशी परत येण्यावर बंदी घातली आहे. तसेच या नियमांचे पालन कठोरपणे करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी दंडासह तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने जरी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार हे नियम सोमवारपासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी याविषयी माहिती दिली. सरकार भारतातील कोरोनाच्या परिस्थितीला हलक्यात घेणार नसून देशाची आरोग्य व्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन सरकारच्या या निर्णयावर काहींनी आक्षेप घेतला आहे. ऑस्ट्रेलियन नागरिकांनाच त्यांच्या देशात न येऊ देण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे त्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.