नवी दिल्ली – योग्य मानांकनाच्या आधारावर बांगलादेशाची आर्थिक परिस्थिती भारतापेक्षा चांगली नाही किंवा भविष्यातही आर्थिक परिस्थितीत बांगलादेश भारताच्या पुढे जाण्याची शक्यता नाही, असे अर्थमंत्रालयाचे माजी सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांनी म्हटले आहे.
बांगलादेशचे दरडोई उत्पन्न भारतापेक्षा पुढील वर्षात जास्त होण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे. यावरून विरोधी पक्ष मोदी सरकारवर टीका करीत आहेत. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी भारतीय जनता पक्षाने गेल्या सहा वर्षांमध्ये केलेल्या अयोग्य कामामुळे भारताची आर्थिक परिस्थिती बांगलादेशापेक्षा खराब झाली असल्याची टीका केली आहे.
खरेदी क्षमतेच्या आधारावर भारताचे राष्ट्रीय उत्पन्न बांगलादेशाच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा 11 पटीने जास्त आहे असे स्पष्टीकरण अर्थमंत्रालयाच्या सूत्रांनी अगोदरच केले आहे. अयोग्य आकडेवारीच्या तुलनेच्या आधारावर यासंदर्भात वादग्रस्त विधाने केली जात आहेत, असे सुब्रमण्यन म्हणाले.
अर्थव्यवस्थेच्या मूल्यांकनासाठी अनेक महत्त्वपूर्ण निकष वापरले जातात. त्यापैकी दरडोई उत्पन्न हा एक निकष आहे. मात्र, केवळ त्या आधारावर दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थाची तुलना केली जाऊ शकत नाही. करोना व्हायरसमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे.
विकासदर शुन्य टक्क्याच्या खाली जाण्याची शक्यता आहे. 2022 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था पूर्ववत होईल. भारतीय अर्थव्यवस्थेवर करोनाचा तीन वर्षे कमी-अधिक प्रमाणात परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे.
2008 पासून भारत सर्वांत जास्त वेगाने वाढणाऱ्या देशापैकी एक आहे. भारताची वित्तीय परिस्थिती आताही मजबूत आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून पुन्हा भारताचा विकासदर जगात सर्वात जास्त राहणार आहे, असे सुब्रमण्यन यांनी स्पष्ट केले.