साउदम्प्टन – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टी व वातावरण यांचा पुरेपूर लाभ घेत भारतीय फलंदाजांना रोखले. मात्र, भारताचे गोलंदाज याच बाबतीत कमी पडले. जसप्रीत बुमराह व महंमद शमी हे स्विंग गोलंदाज नाहीत. त्यामुळे भारतीय गोलंदाजी न्यूझीलंडसमोर सपशेल अपयशी ठरली, अशी टीका न्यूझीलंडचा माजी कसोटीपटू वेगवान गोलंदाज सायमन डुल याने केली आहे.
भारताचा डाव 217 धावांवर गुंडाळत न्यूझीलंडने अर्धी कामगिरी तर केलीच आहे. इंग्लंडमधील वातावरणात कशी गोलंदाजी करायला हवी याचे धडेच त्यांनी भारतीय गोलंदाजांना दिले. मात्र, त्यातून त्यांनी काहीही बोध घेतला नाही. न्यूझीलंडच फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात भारताचे गोलंदाज अपयशी ठरले, असेही डुल याने सांगितले.
साउदम्पटनची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अऩुकूल आहे. तरीही बुमराह, ईशांत व शमी चेंडू स्विंग करण्यात अपयशी ठरत होते. याउलट न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलत भारताला कमी धावसंख्येत रोखले.
ईशांत व्यतिरिक्त भारतीय संघात एकही स्विंग गोलंदाज नाही. शमी हा स्विंग गोलंदाज नाही तर मध्यमगती गोलंदाज आहे. बुमराहदेखील अपेक्षित गोलंदाजी करण्यात अपयशी ठरतोय, असेही डुल याने म्हटले आहे.