गयाना – अंगक्रीश रघुवंशी व राज बावा यांच्या घणाघाती शतकी खेळीच्या जोरावर भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाने आयसीसी 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत युगांडावर 326 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने उभारलेल्या 405 धावांसमोर युगांडाचा डाव अवघ्या 79 धावांवर कोलमडला.
त्यांच्या सहा फलंदाजांना तर खातेही उघडता आले नाही. युवा विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या सामन्यात भारताने स्पर्धेच्या ब गटातील आपल्या तीनही साखळी लढतीत विजय मिळवला भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी, तर दुस-या सामन्यात आयर्लंडवर 174 धावांनी विजय मिळवला होता.
अंगक्रीष रघुवंशीने 120 चेंडूत 22 चौकार व 4 षटकारांच्या मदतीने 144 धावांची खेळी केली. त्याला तोलामोलाची साथ देताना राज बावाने 108 चेंडूत 14 चौकार व 8 षटकार फटकावताना नाबाद 162 धावांची खेळी केली. भारताने 50 षटकात पाच गडी गमावून 405 धावांचा डोंगर उभारला. या स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी भारताने 2004 सालच्या स्पर्धेत 425 धावांचा डोंगर उभारला होता.
विजयासाठी 406 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या युगांडाच्या सहा फलंदाजांना तर भोपळाही फोडता आला नाही. त्यांचा डाव भारताच्या गोलंदाजीसमोर अवघ्या 79 धावांत संपूष्टात आला. त्यांच्या कर्णधार पास्कल मुरुंगीने 34, तर रोनाल्डो ओपीयो 11 या दोघांनाच दोन अंकी धावा करता आल्या. भारताचा कर्णधार निशांत सिंधूने 4 गडी बाद केले. राजवर्धन हंगरगेकरने 2 गडी बाद केले. या स्पर्धेत आता भारताला मोठी विश्रांती असून येत्या 29 तारखेला त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बांगलादेशशी होणार आहे.
संक्षिप्त धावफलक – भारत – 50 षटकांत 5 बाद 405 धावा. (अंगक्रीष रघुवंशी 144, राज बावा नाबाद 162, पास्कल मुरुंगी 3-72). युगांडा – 19.4 षटकांत सर्वबाद 79 धावा. (पास्कल मुरुंगी 34, रोनाल्डो ओपीयो 11, निशांत सिंधू 4-19, राजवर्धन हंगरगेकर 2-8).