नवी दिल्ली/जिनिव्हा – भारताने इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोन्ही देशांना संयम दाखवण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष त्वरित थांबवण्यात यावा, असे भारताने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रात भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी.एस.तिरुमूर्ती यांनी या संदर्भात निवेदन जारी केले आहे. त्यांनी दोन्ही बाजूंना तणाव वाढविणाऱ्या कृतीपासून दूर राहण्याचे व विद्यमान स्थितीत एकतर्फी बदल करण्याचा प्रयत्न टाळण्याचे आवाहन केले आहे.
हमासने इस्त्रायलच्या अश्कलोनवर रॉकेट डागले तेव्हा मारल्या गेलेल्या सौम्या संतोष यांच्या मृत्यूबद्दलही ते बोलले. सौम्या संतोष या मूळच्या केरळी महिला होत्य आणि त्या कामानिमित्त इस्रायलमध्ये असताना हमासच्या रॉकेट हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
या रॉकेट हल्ल्यात भारताने एक इस्रायलमध्ये राहणाऱ्या एक काळजीवाहू नागरिकही गमावल्याचे तिरुमूर्ती म्हणाले. सध्याच्या प्रक्षोभक आणि भीषण हिंसाचारात,जीव गमावलेल्या इतर सर्व नागरिकांसह सौम्या संतोष यांच्या मृत्यूबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला.