टोकीओ : जपानमध्ये सुमारे दोन महिन्यांपासून अडकून पडलेल्या 900 भारतीयांची अवस्था अगतिक झाली आहे. एका बाजूला त्यांच्या व्हिसाची मुदत संपली आहे. तर दुसऱ्या बाजूला विमान कंपन्यांनी त्यांना त्यांच्या विमानाचे बुकिंग यापुढे वैध नसल्याचे सांगितले आहे.
जपानमध्ये अडकेलेल्या भारतीयांपैकी बहुतांश जण व्यावसायिक दौऱ्यावर गेले होते. तर काही जण कंपनीच्या कंत्राटावर गेले होते. मात्र भारतात 25 मार्चपासून लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना भारतात परत येणे अवघड बनले आहे. त्यातच त्यांच्या व्हिसाची मुदतही संपत आली आहे किंवा संपली आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.
भारतात लॉकडाऊन चारची घोषणा झाल्यावर भारतीयांनी ट्विटर आणि अन्य समाजमाध्यमांद्वारे भारत सरकार आणि भारतीय दुतावासाशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. सरकारने 31 देशांत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सुरू केलेल्या वंदे भारत मोहिमे अंतर्गत जपानमधील भारतीयांना परत आणण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.
सरकारने ही घोषणा केल्यानंतर मोठ्या संख्येने भारतीयांनी अर्ज भरले. मात्र 28 मे आणि एक जून अशी दोनच विमाने यासाठी नियोजित असल्याने या भारतीयांपुढील काळजीत भर पडली आहे. कारण त्यातून सुमारे 200 जण भारतात परत येऊ शकतात. त्यामुळे अन्य भारतीयांनी करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.