पुणे : नोबेल पुरस्कार विजेत्या अभिजित बॅनर्जी यांच्या विचारसरणीला भारतीयांनी नाकारले आहे, अशी आश्चर्यकारक टीका केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने गरीबी निर्मुलनासाठी न्याय योजनेचा समावेश जाहीरनाम्यात केला होता. ही संकल्पना बॅनर्जी यांची होती. त्यावरून गोयल यांनी टीका केली. ते म्हणाले, नोबेल जिंकल्याबद्दल मी अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन करतो. पण आपणा सर्वांना ते आणि त्यांची विचारसरणी माहित आहे. ते डाव्या विचारांचे आहेत. त्यांनी आणलेल्या न्याय योजनेला भारतीयांनी नाकारले आहे.
बॅनर्जी यांनी मोदी सरकारच्या निश्चलीकरण (नोटाबंदी) आणि आर्थिक धोरणांवर टीका केली होती. विकास दर वाढवलेला दाखवण्यासाठी मोदी सरकारने स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचे निकष बदलले. त्याला विरोध करणारे पत्र देशातील 108 अर्थतज्ज्ञांनी लिहिले. त्यात बॅनर्जी यांचा समावेश होता. यापुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजपा नेत्यांनी बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.