नवी दिल्ली – जवळपास दीड महिन्यापूर्वी म्हणजेच 22 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून झेपावलेले “चांद्रयान-2′ अनेक महत्त्वाचे टप्पे पार पाडत अखेर चंद्राजवळ पोहोचले आहे. चंद्रापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेले महत्वाकांशी “चांद्रयान-2’साठी शुक्रवारी दिवसभर भारतीयांनी प्रार्थना केली.
भारत चंद्रावर इतिहास घडवण्याच्या अत्यंत समीप पोहोचला आहे. सर्वसामान्य भारतीयांसह चांद्रयान-2 मोहिमेत सहभागी असलेल्या वैज्ञानिकांमध्ये उत्सुक्ता आणि तितकचं टेन्शनही आहे. विक्रम लॅंडरच्या आतमध्ये प्रग्यान रोव्हर आहे. हा रोव्हर चंद्रावर शोधकार्याचे काम करणार आहे. इस्रोचे प्रमुख डी. के.सिवन यांनी चंद्रावरील या लॅंडिंगची तुलना नवजात अर्भकाबरोबर केली आहे.
अचानक कोणी तरी येऊन नुकतेच जन्मलेले बाळ तुमच्या हातात देते तशी ही घटना असेल. व्यवस्थित आधाराशिवाय तुम्ही ते बाळ हातात पकडू शकता का? ते मुल कुठल्याही दिशेला वळेल पण तुम्हाला ते व्यवस्थित पकडायचे आहे. विक्रम लॅंडरचे लॅंडिंग सुद्धा असाच अनुभव असेल. नवजात बाळासारखे तुम्हाला लॅंडरला हाताळायचे आहे, असे सिवन यांनी सांगितले.
दोन सप्टेंबरला विक्रम लॅंडर ऑर्बिटरपासून वेगळा झाला. तेव्हापासून आतापर्यंत दोनवेळा यशस्वीरित्या कक्षाबदल करुन विक्रम चंद्राच्या जवळ पोहोचला आहे. चंद्रावर लॅंडिंग करण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे आणि आमच्यासाठी नवीन आहे. यापूर्वी ज्यांना अशा लॅंडिंगचा अनुभव आहे त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येकवेळी ती कठीण प्रक्रिया होती. आमची ही पहिलीच वेळ आहे, असे सिवन यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या वैज्ञानिकांचे कौतुक केले आहे. 130 कोटी भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तो लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. आणखी काही तासांनी चांद्रयान- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. संपूर्ण जग आमच्या अवकाश संशोधकांचे कौशल्य आणि ताकत पाहील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.