झली दालाबेहरा, जेरेमी लालरिनुंगा, अन्नू राणी आणि पारुल यांची पदकांची कमाई
दोहा – येथे होत असलेल्या आशियाई ऍथेलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये भारताच्या अठेलेटिक्स संघाने आपापल्या गटांमध्ये चमकदार कामगिरी नोंदवली आहे. यावेळी स्पर्धेत 45 किलो वजनी गटात झिली दालाबेहरा, जेरेमी लालरिनुंगा, अन्नु राणी आणि पारुल चौधरी यांनी पदकांची कमाई केली असून मिराबाई चाणु, द्युती चंद यांनी देखील चमकदार कामगिरीची नोंद केली आहे.
झिलीने भारताचे पदकांचे खाते उघडले!
भारताच्या झिली दालाबेहेराने आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले. झिलीने 45 किलो वजनी गटात भारताला रौप्यपदक मिळवून दिले. मात्र माजी विश्वविजेत्या मिराबाई चानूचे 49 किलो वजनी गटातील कांस्यपदक तांत्रिक नियमामुळे थोडक्यात हुकले.
कनिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या झिलीने या स्पर्धेतदेखील दमदार कामगिरीची नोंद केली. झिलीने स्नॅचमध्ये 71 किलो तर क्लिन अँड जर्क प्रकारात 91 किलो असे एकूण 162 किलो वजन उचलत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. व्हिएतनामच्या व्योंग थी हुयेनने 168 किलो (76 किलो स्नॅच आणि 91 किलो क्लिन अँड जर्क) वजन उचलत सुवर्णपदक तर फिलिपाइन्सच्या मेरी फ्लोर दियाजने 158 किलो (69 किलो स्नॅच आणि 89 किलो क्लिन अँड जर्क) वजन उचलत कांस्यपदक पटकावले.
अन्नू, पारुलकडून भारताला दोन पदके
भालाफेकपटू अन्नू राणी आणि 5000 मीटरची धावपटू पारुल चौधरी यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावत आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताचे पदकांचे खाते उघडले. अन्नूने तिच्या सर्वोत्तम कामगिरीपेक्षा सुमारे दोन मीटर कमी कामगिरीची नोंद करताना 60.22 मीटर भालाफेक केली, तर चीनच्या लू हुईहुईने सुवर्णपदक मिळवताना तब्बल 65.83 मीटर भालाफेक केली. भारताला दुसरे पदक 5000 मीटर शर्यतीत पारुलने मिळवून दिले. पारुलने आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना 15 मिनिटे 36 सेकंद 03 शतांश सेकंद अशी वेळ दिली, तर चौथ्या आलेल्या नाशिकच्या संजीवनी जाधवने 15 मिनिटे 41 सेकंद 12 शतांश सेकंद अशी वेळ नोंदवली. या गटात बहारिनच्या मुटिले विनफ्रेड यावी आणि बोंटू रेबिटू यांनी सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले.
भारताच्या जेरेमीची दमदार कामगिरी
युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिनुंगा याने रविवारी आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रमी कामगिरीसह आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले.
जेरेमीने “ब’ गटात 67 किलोमध्ये स्नॅचमध्ये युवा विश्व व आशियाई विक्रम मोडला. त्याने तीनपैकी दोन प्रयत्नांमध्ये 130 व 134 किलो वजन पेलले. त्याने यंदा 131 किलो वजन पेलले होते. जेरेमीने क्लीन ऍण्ड जर्कमध्ये आपल्या शरीराच्या वजनाच्या तुलनेत दुप्पट वजन दोन यशस्वी प्रयत्नांमध्ये (157 व 163 किलो) पेलले. त्याने कजाखस्तानच्या साईखान तेइसुयेवचा 161 किलोचा विक्रम मोडला.
जेरेमीने एकूण 297 किलो वजन उचलले. तो पाकिस्तानच्या ताल्हा तालिबच्या तुलनेत पिछाडीवर राहिला. त्याने 304 किलो वजन पेलले. ही स्पर्धा ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा आहे. त्यातील गुणांची टोकियो ऑलिम्पिक 2020 च्या अखेरच्या रॅंकिंगमध्ये दखल घेण्यात येईल.
मीराबाईने 49 किलो गटात आपली सर्वोत्तम कामगिरी केली, पण ती कांस्यपासून थोडक्यात वंचित राहिली. तिने स्नॅचमध्ये 86 किलो वजन उचलले व क्लीन ऍण्ड जर्कमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना 113 किलो वजन पेलले. तिने एकूण 199 किलो वजन उचलले. यापूर्वी चानूची सर्वोत्तम कामगिरी 192 किलो होती. चीनच्या झांग रोंगनेही 199 किलो वजन पेलले. पण नव्या नियमानुसार ती कांस्यची मानकरी ठरली. या नियमानुसार क्लीन ऍण्ड जर्कमध्ये कमी वजन उचलणाऱ्या खेळाडूला एकूण वजन गटात वरचे स्थान मिळते. चीनच्या होऊ झिहुईने सुवर्ण, तर उत्तर कोरियाच्या रि सोंग गमने रौप्यपदक पटकावले.
राष्ट्रीय विक्रमासह द्युती चंद उपांत्य फेरीत
द्युती चंदने महिलांच्या 100 मीटर शर्यतीमध्ये स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम मोडत आशियाई ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. परंतु महिलांच्या 400 मीटर शर्यतीत हिमा दासला पाठदुखीचा त्रास झाल्याने स्पर्धा अर्धवट सोडून द्यावी लागली आहे.
23 वर्षीय द्युतीने 11.28 सेकंदांची वेळ देत 100 मीटरची चौथी शर्यत जिंकली. गुवाहाटी येथे गेल्या वर्षी प्रस्थापित केलेला 11.29 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम तिने मोडला. मात्र जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी आवश्यक असलेली 11.24 सेकंदांची वेळ तिला गाठता आली नाही.
400 मीटर शर्यतीच्या पात्रता फेरीत भारताची एम.आर.पूवम्मा हिने दुसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरी गाठली. बहारिनच्या सालवा नासेरने पहिला क्रमांक मिळवला. परंतु हिमाला ऐन स्पर्धेतच पाठदुखीचा त्रास वाटू लागल्याने तिला शर्यत पूर्ण करता आली नाही. त्यामुळे ती अंतिम फेरीसाठी पात्रच होऊ शकली नाही.