पुणे – भारतीय महिला क्रिकेट संघाने मार्च 2020 मध्ये टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर करोनाचा धोका सुरू झाला व क्रिकेट ठप्प झाले. त्यानंतर अमिरातीत झालेल्या प्रदर्शनिय सामन्यांचा आपवाद वगळता भारताचे महिला क्रिकेटचगडप झाल्याचे दिसत आहे. बीसीसीआयने मोठ्या मोठ्यागोषमा केल्या असल्या तरीही महिला क्रिकेटपटूंना मैदानात उतरण्यासाठी सध्या तरी एकही स्पर्धा घोषित झालेली नाही.याबाबत बीसीसीआयच्या एकाही सदस्याने प्रतिक्रीया व्यक्त करण्याची तयारी दर्शवलेली नाही.
एकदिवसीय सामन्याचा विचार केल्यास भारताच्या महिला संघाने अखेरचा सामना 6 नोव्हेंबर 2019 रोजी खेळला. म्हणजे जवळपास गेल्या पाचशे दिवसांपासून संघाने एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. ही दशकातील आतापर्यंतची सर्वात मोठी विश्रांती ठरली आहे.
आता दक्षिण आफ्रिका संघ मार्चमध्ये भारतीय दौऱ्यावर येणार आहे. यादरम्यान 5 एकदिवसीय व 3 टी-20 सामने खेळवले जातील. मालिकेची तारीख व ठिकाण अद्याप घोषित करण्यात आले नाही. त्यामुळे याच मालिकेतून यजमान भारताच्या महिला संघाला वनडे सामन्याच्या निमित्त्याने दीर्घ विश्रांतीनंतर मैदानावर उतरण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे ही मालिका महिला संघाच्या खेळाडूंसाठी पर्वणीच ठरणारी आहे.
जानेवारी 2000 पासून भारतीय संघांनी खेळलेल्या सामन्यांच्या आलेखात महिला टीम मागे आहे. पुरुष संघाने तिन्ही प्रकारांत 918 व महिलांना 260 सामने खेळण्याची संधी मिळाली. पुरुष संघाला 3.5 पटीने अधिक सामने खेळण्यास मिळाले. गतवर्षी महिला आयपीएलमध्ये केवळ 4 सामने खेळवण्यात आले.
पुरुष व महिला खेळाडूंना मिळाल्या निधीत देखील फरक आहे.
पुरुष गटात अ+ गटातील खेळाडूंना 7 कोटी मिळतात आणि महिला अ गटातील खेळाडूंना 50 लाख मिळतात. म्हणजे दोन्ही गटांतील अव्वल खेळाडूंमध्ये 14 टक्के फरक आहे. अ गटात पुरुषांमध्ये 5 कोटी, ब गटात 3 कोटी व क गटात 1 कोटी रुपये दिले जातात. महिलांमध्ये ब गटात 30 लाख व क गटातील खेळाडूंना 10 लाख रुपये मिळतात.
भारताचा महिला संघ एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी करत आहे. 2005 व 2017 मध्ये संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. दोन्ही वेळा संघ उपविजेता ठरला. दुसरीकडे, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या महिला संघाने प्रवेश केला होता. तेव्हा, संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
घोषणांचे काय होणार
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला क्रिकेटला नवसंजीवनी देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच महिलांसाठी येत्या काळात संपूर्ण आयपीएल स्पर्धा सुरु करणार अशीही घोषणाकेली होती. मात्र, करोनाचा धोका देशातून आता दूर होत असल्याचे दिसत असूनही त्याबाबत पुढे काहीही वेळापत्रक जाहीर झालेले दिसत नसल्याने या घोषणांचे काय होणार हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.