आहूस (डेन्मार्क) – फुलराणी सायना नेहवाल व पि. व्ही. सिंधू यांच्या अनुपस्थितीत खेळताना भारताच्या महिला बॅडमिंटनपटूंनी उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेत मंगळवारी अफलातून कामगिरी करत स्कॉटलंडवर 4-1 असा दणदणीत विजय मिळवला.
पहिल्या सामन्याप्रमाणेच याही सामन्यात सायना खेळू शकली नाही. ती नसल्याचे कोणतेही दडपण भारतीय खेळाडूंनी घेतले नाही व सरस खेळ केला. भारताचे या स्पर्धेत 411 गुण झाले असून थायलंड 420 गुणांसह आघाडीवर आहे. या स्पर्धेत आता बुधवारी भारतीय महिलांची थायलंडशी लढत होणार आहे.
मालविका बनसोडला पहिल्या लढतीत क्रिस्टिना गिल्मोरकडून 21-13, 21-9 अशी हार पत्करावी लागली मात्र, आदिती भटने तिची पहिली लढत जिंकत जिंकताना रशेल सुदेनचा 21-14, 21-8 असा पराभव करत भारताला बरोबरी साधून दिली. त्यानंतर मात्र, संपूर्ण स्पर्धेत भारतीयांचेच वर्चस्व राहिले. दुहेरीच्या गटात तनिशा कॅस्ट्रो व रुतूपर्ण पांडा यांनी विजय मिळवला.
या जोडीने ज्युली मॅचफेर्सन व किआरा टोरेन्सचा 21-11, 21-8 असा पराभव केला. एकेरीत तस्मिन मीरने लॉरेन मिडेलटेनचा 21-15, 21-6 असा पराभव करत विजय प्राप्त केला. दुहेरीच्याच अन्य एका लढतीत त्रिसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी क्रिस्टिना गिल्मोर व एलेनॉर ओडोनेल यांचा 21-9, 18-21, 21-10 असा पराभव केला.
सायनाच्या दुखापतीने चिंता
भारताची फुलराणी सायना नेहवाल उबर करंडक बॅडमिंटन स्पर्धेतील पुढील लढतीत खेळणार का याकडे लक्ष राहणार आहे. तिने या स्पर्धेतील पहिल्याच लढतीतून दुखापतीने माघार घेतली होती. या स्पर्धेत भारतीय महिला बॅडमिंटन संघाने स्कॉटलंडचाही पराभव केला आहे. मात्र, या सामन्यातही सायना सहभागी झाली नाही. आता थायलंडविरुद्धच्या सामन्यात तरी ती खेळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.