मराठमोळ्या पूनम राऊतची अर्धशतकी खेळी
पुणे: दिल्लीत झालेल्या भारत आणि बांगलादेश टी २० सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. परंतु वेस्टइंडिज विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात भारतीय महिलांनी दुसऱ्या वन-डे सामन्यात विजय मिळवला आहे. मराठमोळी पुनम राऊतचं अर्धशतक आणि कर्णधार मिताली राज-हरमनप्रीत कौरच्या आक्रमक खेळाच्या जोरावर हा सामना जिंकला आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय महिलांनी ६ गड्यांच्या मोबदल्यात १९१ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल भारतीय महिलांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारतीय महिलांनी ५३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत १-१ ने बरोबरीही साधली आहे.
नाणेफेक जिंकून भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या सामन्यासुरवातीलाच प्रिया पुनिया आणि जेमायमा रॉड्रीग्ज या झटपट माघारी परतल्या. त्यानंतर पुनम राऊत आणि मिताली राज यांनी महत्वाची भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला.
पुनमने यादरम्यान अर्धशतकी खेळी केली तर मिताली राजने ४० धावांची खेळी केली. तसेच हरमनप्रीत कौरने देखील ४६ धावांची खेळी करत भारताला १९१ धावांचा टप्पा गाठून दिला. विंडीजकडून आलिया अॅलेन, अॅफी फ्लेचर यांनी प्रत्येकी २ तर आयेशा मोहम्मद आणि शबिका गजनाबी यांनी १-१ बळी घेतला.