गुयाना : भारतीय महिला क्रिकेट संघाने कामगिरीत सातत्य राखत विंडीजचा चौथ्या टी-२० सामन्यातही पराभव केला आहे. पावसामुळे ९ षटकांचा झालेल्या रोमांचक सामन्यात भारताने ५ धावांनी विजय संपादित केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे.
पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात भारताने ९ षटकांत ७ बाद ५० धावा केल्या. प्रत्युत्तरात विंडीजच्या संघाला ९ षटकांत ५ बाद ४५ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. फलंदाजीत ११ धावा आणि गोलंदाजीत ३ विकेट घेणा-या हेली मैथ्यूज हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
भारताकडून फलंदाजीत पूजा वस्त्राकर हिने सर्वाधिक १० धावा केल्या. शेफाली वर्मा ७, जेम्मिहा रोड्रिगेज ६, वेदा कृष्णमूर्ति ५ हरमनप्रीत कौर ६ आणि तानिया भाटियाने ८ धावा केल्या.
What a finish we have witnessed. West Indies Women needed 13 off the final over and Anuja Patil kept it really tight giving away just 7 runs. ?#TeamIndia win by 5 runs & make it 4-0! pic.twitter.com/9Jg0Hfek2a
— BCCI Women (@BCCIWomen) November 17, 2019
विंडिजकडून फलंदाजीत हेली मैथ्यूज आणि चिनले हेनरीने प्रत्येकी ११ धावा केल्या. नताशा मैक्लीनने १० धावा केल्या. विंडिजने शेवटपर्यंत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले. भारताकडून गोलंदाजीत अनुजा पाटीलने २ तर दीप्ती शर्मा आणि राधा यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली.
मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना २० नोव्हेंबरला होणार आहे. मालिका ५-० ने जिंकून विंडीजला व्हाॅईटवाॅश देण्याचा भारतीय महिला संघाचा प्रयत्न असणार आहे.