सिडनी – ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत साखळीतील सर्व सामने जिंकून भारतीय संघाने दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर आज उपांत्य फेरीचा सामना न खेळताच भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय संघाने पहिल्यांदाच टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
भारत आणि इंग्लंड दरम्यान अंतिम फेरीसाठी आज उपांत्यफेरीचा सामना होणार होता. पण, सिडनी येथे जोरदार पाऊस झाल्याने अखेर हा सामना रद्द करण्यात आला आणि भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल झाला.
The #INDvENG semifinal is called off due to rain. #TeamIndia ???? make it to their maiden #T20WorldCup final. pic.twitter.com/y4rfDWjzFi
— BCCI Women (@BCCIWomen) March 5, 2020
भारतीय संघाने अ गटात साखळीतील सर्व सामने जिंकून अव्वलस्थान पटकावले होते. तर, ब गटात इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानी होता. आयसीसीच्या नियमानुसार सामना रद्द झाल्यास गटात अव्वल असलेल्या संघास थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार होता. त्यानुसार भारतीय संघास अ गटात अव्वल राहिल्याचा फायदा झाला.
याआधी भारतीय संघाने 2009, 2010 आणि 2018 मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. पण, अंतिम फेरीत प्रवेश करण्यास संघास अपयश आले होते. त्यामुळे यंदा स्पर्धेचे विजेतेपद मिळवून इतिहास रचण्याची संधी भारतीय महिला संघास आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका दरम्यान होणार असून या सामन्यातील विजेता 8 मार्चला (रविवारी) भारतीय संघाशी अंतिम सामना खेळेल.