नवी दिल्ली : इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमच्या चकचकीत प्रकाशात आणि जल्लोषाच्या गजरात भारतीय महिलंनी खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावून इतिहास घडवला! नेपाळला अंतिम सामन्यात पराभूत करत भारतीय संघाने संपूर्ण देशाला अभिमानाचा क्षण मिळवून दिला. भारतीय महिला संघांने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमवर भारताचे नाव विश्वचषकावर सुवर्णअक्षरात कोरले.
भारतीय खो-खो संघांने एक अनोखा आणि गौरवास्पद इतिहास रचला आहे. भारताच्या महिला संघांने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकात संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवत पहिले विश्वविजेतेपद पटकावले. महिलांच्या सामन्यात भारताने नेपाळवर ७८-४० असा ३८ गुणांनी विजय साकारला.अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघांने आपल्या चपळ खेळाने प्रेक्षकांना थक्क केले. महिला संघानेही उत्कृष्ट संघभावना आणि अचूक रणनीतीच्या जोरावर नेपाळला हरवून सुवर्ण कामगिरी केली.
महिलांच्या अंतिम सामन्यात पहिल्या टर्नमध्ये भारतीय संघाने आक्रमण करताना नेपाळची पहिली तुकडी ५० सेकंदात, दुसरी तुकडी १.४८ मि. तर तिसरी तुकडी १.२० मि. बाद केली व चौथी तुकडी १ मि. पाचवी तुकडी ४५ सेकंदात तर उरलेले दोन खेळाडू ३४ सेकंदाच्या आत बाद करत भारताच्या खेळाडूंनी ३४ गुण मिळवले या वेळी कर्णधार प्रियांका इंगळे, रेश्मा राठोड यांनी चमकदार खेळी केली.
दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळच्या पहाडी मुलींनी कमालीचा खेळ करत भारताच्या ड्रीम रन गुणसंख्येला वेसन घातले. नेपाळने भारताची पहिली तुकडी तीन मि. नंतर बाद केल्याने भारताला एक ड्रीम रन चैतरा बी ने मिळवून दिला. दुसरी तुकडी १.३९ मि. बाद करण्यात नेपाळला यश मिळाले. तर तिसरी तुकडी ५३ सेकंदाच्या आत तंबूत परतल्याने खरतर भारताला हा मोठा धक्का होता. त्यानंतर नेपाळने आपल्या आक्रमणाची धार वाढवून १.१३ मि. चौथ्या तुकडीला बाद केले. तर त्यानंतर पुढची तुकडी नाबाद खेळल्याने भारताने मध्यंतराला ३५-२४ अशी ११ गुणांची आघाडी घेतली होती.
तिसऱ्या टर्नमध्ये भारताने आक्रमणात नेपाळची पहिली तुकडी १.४२ मि. बाद करून जोरदार प्रतिउत्तर दिले तर दुसरी तुकडी ३३ सेकंदात बाद झाली. तिसऱ्या तुकडीला १.०७ मि. बाद करत भारताने मोठ्या गुणसंख्येकडे वाटचाल सुरु केली. चौथी तुकडी ५० सेकंदात कापून काढली. पाचवी तुकडी ५५ सेकंदात बाद करून नेपाळला जोरदार झटका दिला. तर सहावी तुकडी ३४ सेकंदात बाद करून नेपाळची आणखी एक झटका दिला.
सातव्या तुकडीतील एक खेळाडू बाद करण्यात भारताला यश मिळाल्याने भारताने ७३-२४ अशी गुणांची नोंद केली. या वेळी नेपाळच्या दीप बी के ने चांगला खेळ केला. चौथ्या टर्न मध्ये नेपाळने आक्रमण केले पण ते आक्रमण परतवून लावताने भारताच्या पहिल्या तुकडीने ५.१४ मि. वेळ देत नेपाळला सामन्यात पुन्हा परतण्याची संधीच न देण्याची किमिया साधली व हा सामना भारताने ७८-४० असा ३८ गुणांनी जिंकला.
सामन्याचे पुरस्कार:
सर्वोत्तम आक्रमक: अंशू कुमारी (भारतीय संघ)
सर्वोत्तम संरक्षक : मनमती धानी (नेपाळ संघ)
सामन्याची सर्वोत्कृष्ट खेळाडू: चैतरा बी (भारतीय संघ)
हा विजय केवळ आमच्या संघाचा नव्हे, तर प्रत्येक भारतीय महिलेच्या स्वप्नांचा विजय आहे. या विश्वचषकासाठी आम्ही महिनोंमहिने कष्ट घेतले, प्रत्येक खेळाडूने आपले १०० टक्के योगदान दिले, आणि आज त्या सर्व मेहनतीचं फळ मिळालं आहे. हा महिलांच्या प्रगतीचा आणि देशाच्या गौरवाचा क्षण आहे. नेपाळसारख्या पहाडी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना दबाव मोठा होता, पण आम्ही एक संघ म्हणून उभे राहिलो आणि प्रत्येक क्षणी एकमेकांना पाठिंबा दिला. आज आम्ही इतिहास रचला, पण ही फक्त सुरुवात आहे. भारतीय महिलांचा खेळ प्रत्येक आंतरराष्ट्रीय मंचावर चमकणार, याची खात्री आहे. हा विजय प्रत्येक भारतीयासाठी समर्पित आहे.”
– प्रियांका इंगळे, भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार