श्रीनगर -पाकिस्तानी सैनिकांनी अक्षरश: थैमान घालत बुधवारी भारतीय हद्दीत विविध ठिकाणी मारा केला. नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत करण्यात आलेल्या त्या माऱ्यात 65 वर्षीय भारतीय वृद्ध महिला मृत्युमुखी पडली. त्याशिवाय, 3 भारतीय नागरिक जखमी झाले.
पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करून जम्मू-काश्मीरच्या विविध क्षेत्रांत मारा केला. त्याचे लक्ष्य भारतीय सीमा नाक्यांबरोबरच निवासी भागही ठरले. जम्मू विभागाच्या पूँच जिल्ह्यातील एका गावावर पाकिस्तानी सैनिकांनी तोफगोळे डागले. एका घराजवळ तोफगोळ्याचा स्फोट होऊन दोन महिला जखमी झाल्या. त्यातील वृद्धेचे निधन झाले.
पाकिस्तानी सैनिकांनी उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात केलेल्या माऱ्यात दोन नागरिक जखमी झाले. पाकिस्तानी माऱ्यामुळे एलओसीलगत राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. दरम्यान, पाकिस्तानी कुरापतींना भारतीय सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यामध्ये पाकिस्तानी बाजूचीही हानी झाल्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधी भंगाच्या कुरापती केल्या जातात. त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याचे धोरण भारतीय सुरक्षा दलांकडून अवलंबले जात आहे. त्या प्रत्युत्तरात मोठी हानी होत असूनही पाकिस्तान त्यातून धडा शिकताना दिसत नाही.