डरहॅम – भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत विलगीकरणाचा कालावधी पूर्ण करून भारतीय संघात सामील होण्यासाठी बायोबबलमध्ये परतला आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
पंतने करोनावर मात करून विलगीकरण कालावधीही पूर्ण केल्यामुळे त्याला बायोबबलमध्ये परतण्याची परवानगी देण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघ पराभूत झाल्यावर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी संघाला 20 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती.
या सुट्टीत पंतने डेन्टिस्टकडे जाऊन उपचार घेतले होते तसेच त्याने युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यांना उपस्थिती लावली होती.
त्यावेळीच त्याला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते व त्यामुळे त्याला लगेचच उपचारांसाठी विलगीकरणात पाठवले गेले होते. भारतीय संघ कसोटी मालिकेपूर्वी आणखी एक सराव सामना खेळणार असून त्यात पंत सहभागी होणार आहे.