अहमदाबाद – भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एकेकाळी जागतिक क्रिकेटमधील कोवळा क्रिकेटपटू अशी ओळख निर्माण केलेल्या पटेलचे इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या संघानेही खूप कौतुक केले होते. (Parthiv Patel retire )
तत्कालीन कर्णधार सौरव गांगुली याने पटेलला संघात स्थान देण्याचा हट्ट धरला होता व अखेर निवड समितीने त्याचा संघात समावेश केला. गांगुलीचा हा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे पटेलने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले होते. मात्र, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, दीनेश कार्तिक यांसारख्या तडाखेबंद यष्टिरक्षक फलंदाजांच्या सरस व सातत्यपूर्ण कामगिरीमुळे पटेलची संघातील जागा सातत्याने धोक्यात आली होती.
पटेलने 25 कसोटी, 38 एकदिवसीय तसेच दोन टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने गुजरातकडून 194 सामने खेळले. 2002 साली वयाच्या 17 व्या वर्षी त्याने भारतीय संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
सुरुवातीची काही वर्ष चांगला खेळ केल्यानंतरही 2004 साली दिनेश कार्तिक व धोनीच्या पदार्पणानंतर त्याने संघातील स्थान गमावले. त्याने आयपीएल स्पर्धेतही चेन्नई सुपर किंग्ज, कोची टस्कर्स, डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू व मुंबई इंडियन्सकडून खेळ केला. मात्र, दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीनंतर त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले नाही.
त्याने अखेरचा टी-20 सामना 2011 साली तर, एकदिवसीय सामना 2012 साली खेळला. आता नव्या यष्टिरक्षक फलंदाजांच्या आगमनानंतर त्याला पुन्हा संघात संधी मिळण्याची शक्यताही संपुष्टात आल्याने त्याने अखेर निवृत्तीचा निर्णय घेतला.