–अमित डोंगरे
मीडिया स्ट्रॅटिजी हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. संघ कोणताही असो जेव्हा परदेशी संघ त्यातही भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करतो तेव्हा ऑस्ट्रेलियाचे खेळाडू हीच स्ट्रॅटिजी वापरतात व दडपण आणण्याचा प्रयत्न करतात.
यंदाही तेच झाले आहे. मायकेल क्लार्क, ग्लेन मॅकग्रा, स्टिव्ह वॉ, रिकी पॉंटिंग या माजी खेळाडूंच्या बरोबरच त्यांचा कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनी, मिशेल स्टार्क व डेव्हिड वॉर्नर यांनी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यापासूनच माध्यमांमध्ये मुलाखती देत दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात, माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या कालखंडातच आपण आरे ला कारे करत आल्यामुळे गेल्या दशकापासून भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर साततत्याने वर्चस्व राखले आहे. त्यातच यंदाच्या भारतीय संघातील खेळाडूंनी गेल्या दौऱ्यापासून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना त्यांच्याच भाषेत उत्तर देत आपली कामगिरी सिद्ध केली आहे. या मालिकेतही हेच दिसावे अशी सर्व भारतीय चाहत्यांची अपेक्षा आहे. मुळातच महेंद्रसिंग धोनीचे युग संपले असून आक्रमक विराट कोहलीकडे संघाचे नेतृत्व आहे. त्याचा बेदरकारपणा कमी झाला असला तरीही त्याच्या मूळ स्वभावानुसार तो ऑस्ट्रेलियावरच डाव पलटवू शकतो.
जे जशास तसे उत्तर गांगुली देत होता त्याच वाटेवर कोहलीही प्रवास करत आहे. पॉंटिंग, ऍडम गिलख्रिस्ट यांचा जमाना जुना झाला असून सध्याच्या ऑस्ट्रेलिया संघात मिशेल स्टार्क, स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर हेच काय ते भारतीय खेळाडूंविरोधात स्लेजिंग करू शकतात. मात्र, कोहली आणि कंपनीची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता त्यांच्या या वृत्तीचा फारसा विपरीत परिणाम भारताच्या खेळाडूंवर होणार नाही हेच दिसून येइल.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या मालिकेत भारतीय संघाने त्यांना त्यांच्याच देशात पराभूत करण्याचा विक्रम साकार केला होता. आता त्यांचे लाडके क्रिकेट तज्ज्ञ भारताच्या त्या विजयाचेही महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळच्या संघात स्मिथ व वॉर्नर नव्हते अन्यथा निकाल वेगळा लागला असता, अशी वटवट ते करत असले तरीही क्रिकेटच्या खेळात जर तर ला स्थान नसते. आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते असल्या वल्गनांना खेळात काहीही अर्थ नसतो. जे त्यावेळी ते दोघे खेळाडू संघात नसताना घडले ते यंदा त्यांच्या उपस्थितीतही घडू शकते. कारण आता भारतीय संघ केवळ पर्यटक म्हणून परदेश दौऱ्यांवर जात नाही तर तिथे यजमान देशालाच पराभूत करत आपली गुणवत्ता सिद्ध करून परत येतो.
गांगुलीने आक्रमकता सिद्ध केलेला भारतीय संघ संयम व आक्रमकता यांचे मिश्रण धोनीच्या काळात बनला. आता कोहलीच्या काळात हाच संघ जवळपास प्रत्येक देशात आपल्या यशाच्या पताका झळकावत आहे. आजच्या भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूंचा भरणा आहे. कर्णधार कोहली जरी भारतीय फलंदाजीचा कणा असला तरीही हार्दिक पंड्या, शिखर धवन, लोकेश राहूल यांच्या फलंदाजीतील आक्रमक खेळ पाहिला तर कोहली संयमी वाटू लागतो. पूर्वी भारतीय संघ सचिन तेंडुलकरवर अवलंबून असायचा आता कोहलीने जरी सचिनची जागा घेतली असली तरीही सध्याचा संघ केवळ कोहलीवर अवलंबून आहे असे चित्र दिसत नाही.
सगळेच खेळाडू आपल्यावरील जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसतात. भारताची फलंदाजी जितकी बलाढ्य आहे त्याच्यापेक्षा जास्त गोलंदाजी सशक्त आहे. जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांच्या स्विंग व यॉर्कर्सवर ऑस्ट्रेलियाचे तगडे फलदाज नांगी टाकताना यंदा पाहायला मिळणार असा विश्वास वाटतो. दौरा कोणताही वा कोणत्याही देशाचा असो, मालिकेतील पहिलाच सामना जिंकला तर संपूर्ण मालिकेत सकारात्मकता कायम राहते, त्यामुळे आज(शुक्रवारी) होत असलेला पहिलाच सामना जिंकून यजमान ऑस्ट्रेलियाचा नक्षा भारतीय संघाने उतरवलेला पाहायला मिळावा हीच अपेक्षा आहे.