नवी दिल्ली, दि. 18 – चीनच्या सीमेवर तैनात असलेल्या सर्व भारतीय जवानांकडे शस्त्रे असतात, अशा शब्दात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर दिले आहे. गलवान खोऱ्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना निःशस्त्रपणे शहीद होण्यास पाठवण्यात आले होते, अशा आशयाची पोस्ट राहुल गांधी यांनी ट्विटरवर केली होती. त्याला जयशंकर यांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.
भारत आणि चीन दरम्यान 1996 मध्ये आणि 2005 मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारामध्ये शस्त्रांचा वापर न करण्याची तरतूद आहे. म्हणूनच दोन्ही बाजूंकडून शस्त्रांचा वापर केला जात नाही, असे जयशंकर यांनी सांगितले.
सीमेवर तैनात असलेल्या सर्व जवानांकडे नेहमीच शस्त्रे असतात. विशेषतः तळ सोडून जात असताना शस्त्रे नेहमी बरोबरच असतात. गलवान खोऱ्यात 15 जून रोजीही जवानांकडे शस्त्रे होती. द्विपक्षीय करारानुसार तणावाच्या प्रसंगी शस्त्रांचा वापर न करण्याच्या तरतुदीचे पालन 1996 ते 2005 दरम्यान केले गेले आहे, असे जयशंकर यांनी ट्विटरवर म्हटले आहे.