नवी दिल्ली – देशात करोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर अनलॉकची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जागतिक योग दिनामिमित्त म्हणजेच २१ जून रेल्वेकडून ५० स्पेशल ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
२५ जूनपासून गोरखपूर (उत्तर प्रदेश) ते बांद्रा अशी नवीन ट्रेन सुरु होत असल्याचेही रेल्वेमंत्री यांनी सांगितले आहे. दुरंतो आणि अनेक स्पेशल ट्रेन २१ जूनपासून सुरु होणार आहेत. नव्याने सुरु होणाऱ्या रल्वेमध्ये अनेक एक्स्प्रेस, मेल आणि सुपरफास्ट रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.
रेल्वेकडून जारी केलेल्या यादीनुसार, नवी दिल्ली-कालका शताब्दी, नवी दिल्ली-देहराडून शताब्दी, नवी दिल्ली-अमृतसर शताब्दी, दिल्ली सराय रोहिल्ला-जम्मू तवी दुरंतो, माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली श्री शक्ती एक्स्प्रेस आणि लखनऊ-प्रयागराज संगम एक्स्प्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.