पॅरिस : भारतात करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे येथे करोनाचा हाहाकार दिसून येत आहे. भारतातील दुसरी लाट बघता बिघडलेल्या परिस्थितीमुळे जगातील अनेक देशांचा ताण वाढला आहे. आता फ्रान्सने खबरदारीचे पाऊल म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांसाठी 10 दिवस क्वारंटाइन होणे अनिवार्य केले आहे.
तत्पूर्वी, अमेरिकेने आपल्या नागरिकांना भारताचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. ज्या लोकांनी करोना लस घेतली आहे. त्यांनीदेखील सध्याच्या वातावरणात भारतात जाणे टाळले पाहिजे. त्याचप्रमाणे धोका लक्षात घेता ब्रिटनने देखील भारताला ‘रेड लिस्ट’ मध्ये समाविष्ट केले आहे.
फ्रान्सने यापूर्वी ब्राझीलहून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. यासह सरकारने असे म्हटले आहे की, अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांनाही क्वारंटाइन होणे आवश्यक आहे. करोना विषाणूबाबत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सरकारने सांगितले आहे, जिथे परिस्थिती अत्यंत वाईट आणि चिंताजनक आहे, तेथे आम्ही त्या देशांची करोना स्थिती लक्षा घेऊन कठोर निर्णय घेऊ. आगामी काळात प्रवासबंदीबाबतही निर्णय घेण्यात येईल.