मुंबई – वाहनांचा हॉर्न म्हणून फक्त भारतातील वाद्यांचा आवाज वापरला पाहिजे असे बंधन घालणारा कायदा लवकरच तयार करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी दिली आहे. नाशिक येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, पोलिसांच्या वाहनांवरील आणि रुग्णवाहिकावरील सायरनचा आवाज अतिशय भीतीदायक आणि कर्कश असतो. अशा आवाजाची गरज नाही. त्याऐवजी ऑल इंडिया रेडिओवर सकाळी जर जशा प्रकारच्या अल्हाददायक धून वापरल्या जातात तशा धून वापरण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना आपण करणार आहोत.
वाहनावरील लाल दिवे काढल्यानंतर आपण पोलिसांची वाहने व अँब्युलन्सवरील सायरनवर लक्ष केंद्रित केले आहे. आकाशवाणीवर सकाळी जी अल्हाददायक धून वापरली जाते तशा प्रकारची धून ऍम्ब्युलन्सवर वापरण्याचा माझा विचार आहे. त्यामुळे लोकांना त्रासदायक वाटणार नाही. कर्कक्ष आवाजाऐवजी बासरी, तबला, व्हायोलिन, हार्मोनियम, माउथ ऑर्गन अशा प्रकारच्या वाद्यांचा आवाज वापरला जाऊ शकतो. त्यामुळे कानाला त्रास होत नाही. या विषयाचा आपण शास्त्रीय पद्धतीने अभ्यास चालू केला असून यासंदर्भात पर्यायी उपाययोजना लवकरच जाहीर करण्यात येतील असे गडकरी यांनी सांगितले.
त्याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतातील अपघातामुळे देशाचे आणि अर्थव्यवस्थेचे अतोनात नुकसान होत असलक्याचे सांगितले. हे नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक वर्षी भारतामध्ये पाच लाख अपघात होतात. त्यामध्ये दीड लाख लोक मृत्युमुखी पडतात. त्याचा राष्ट्रीय उत्पन्नावर तीन टक्के परिणाम होतो असे ते म्हणाले.
अपघात कमी करण्यासाठी तामिळनाडू सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे तेथे अपघाताचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी झाले आहे. मुंबई- पुणे हायवेवरील अपघाताचे प्रमाण कमी झाले असले तरी अजूनही महाराष्ट्रातील अपघाताचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. अपघातामुळे मनुष्यहाणी होऊ नये याकरिता सर्व वाहनांमध्ये सहा एअरबॅग लावण्याच्या संकल्पनेवर गंभीरपणे विचार चालू असल्याचे त्यांनी सांगितले.