टोकियो – भारतातील प्रसारमाध्यमे चार वर्षे खेळाडूंकडे, त्यांच्या कामगिरीकडे व समस्यांकडे दुर्लक्ष करतात व ऑलिम्पिकला पंधरा दिवस राहिले की त्यांना जाग येते, अशा शब्दांत भारताचा माजी ऑलिम्पिक पदकविजेता मुष्टियोद्धा विजेंदर सिंग याने संताप व्यक्त केला आहे.
जर माध्यमांनी सातत्याने खेळाडूंची दखल घेतली तरच ऑलिम्पिक पदकतालिकेत संख्या वाढलेली दिसेल, तसेच देशात खऱ्या अर्थाने क्रीडा संस्कृती रुजेल, असेही तो म्हणाला.
मुद्रित तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमे चार वर्षे ऑलिम्पिक खेळांकडे दुर्लक्ष करतात आणि स्पर्धेला 15 दिवस राहिले की त्यांचे डोळे उघडतात. खेळाडू अपयशी ठरल्यावर लगेच टीकाही करतात की, पदके का आणली नाहीत. पण समस्या शोधा त्यांच्या मुळाशी जा, खेळाडूंची मूळ मागणी काय आहे, त्यांना कोणत्या सुविधा पुरवल्या जातात ते पाहा तरच प्रगती होईल, असेही त्याने म्हटले आहे.
एखाद्या खेळाडूने यश मिळवले तरच त्याला नोकरी किंवा अन्य सुविधा देण्यात येतात, मग तोच दृष्टिकोन सगळ्याच खेळाडूंसाठी लावला गेला तर त्यांनाही स्थैर्य मिळेल व हे खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करतील व त्याची साक्ष आगामी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. विजेंदरने 2004 सालच्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मुष्टियुद्धात ब्रॉंझपदक पटकावले होते.