बेंगळुरू -भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज अभिमन्यु मिथून याने अखेर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने 4 कसोटी तसेच पाच एक दिवसीय सामने खेळले. मिळालेल्या संधीचे सोने करण्यात त्याला अपयश आल्यामुळे नंतर त्याची निवड भारतीय संघात होऊ शकली नाही.
मात्र, त्याने प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये 103 सामने खेळताना 338 बळी मिळवले. तसेच लीस्ट ए गटाच्या 96 सामन्यात तसेच 74 टी-20 सामन्यात मिळून त्याने 205 बळी मिळवले. कर्नाटकमध्ये अनेक नवोदित गोलंदाज असून त्यांना आता सातत्याने संधी मिळावी यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले आहे.
मिथून हा क्रिकेटपटू म्हणून नावारुपाला येण्यापूर्वी मैदानी स्पर्धेतील सर्वोत्तम थाळीफेकपटू होता. मात्र, नंतर त्याला क्रिकेटची गोडी लागली. त्याने श्रीलंकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते .
तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एक दिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर बेंगळुरू तसेच सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल स्पर्धेतही सहभाग घेतला होता.